खबरदार! आता नाशिक पोलीस आयुक्तांनी दिला भोंग्यांवर अल्टिमेटम, ३ मेपर्यंत…
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( raj thackeray ) यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केल्याने त्यावरून राजकारण तापलं आहे. तसंच ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरण्याचा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी सरकारला दिला. आता नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे ( nashik police commissioner deepak pandey ) यांनी भोंग्यांबाबत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.
सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यांसाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. धार्मिक स्थळांनी ३ मे पर्यंत भोंग्यांसाठी परवानगी घ्यावी, असे आदेश नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत. आदेशानुसार परवानगी न घेतलेल्या संबंधित अनधिकृत भोंग्यांवर कारवाई केली जाणार, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.
कुठल्याही मशिदीच्या १०० मीटर परिसरात हनुमान चालीसा म्हणण्यास मनाई करण्यात आली आह, असे पोलीस आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. यासोबतच अजानच्या वेळी हनुमान चालीसा लावता येणार नाही. मशिदीत अजान होण्याच्या १५ मिनिटं आधी हनुमान चालीसा लावता येईल, असे पोलीस आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. धार्मिक स्थळांवर कोण्याही कार्यक्रमासाठी भोंगे लावायचे असल्याच परवानगी आवश्यक आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. आदेशाचं पालन न करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितलं.
गुढीपाडव्याला राज ठाकरेंनी दिला होता अल्टिमेटम
मुंबईत मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत मोठी घोषणा केली होती. मशिदीवरींल मोठ्या भोंग्यांविरोधात मनसे आंदोलन करणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसे हनुमान चालीसा म्हणेल असे, राज ठाकरेंनी म्हटले आहे. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा म्हणण्यास सुरवात केली. यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे आणि राजकारणही. तर मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा हा धार्मिक नसूल सामाजिक आहे, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तर नाशिक पोलीस आयुक्तांचा आदेश हा स्वागतार्ह आहे. राज ठाकरेंनी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानुसार पोलीस आयुक्तांचा आदेश दिसून येत असल्याचं मनसेने म्हटलं आहे.