‘भूकंपापुर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन बदलत असत; त्याचप्रमाणे सत्ताधारी पक्षातील आमदारांची अवस्था’
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सत्तासंघर्षाची जोरदार चर्चा सुरू आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही आमदारांसह गुवाहाटीला गेले होते. महाविकास आघाडी सरकार पडण्याचे प्रमुख कारण हे आमदारांची नाराजी हे होते. त्यातच आता शिंदे फडणवीस सरकारमध्ये आमदार नाराज असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन बदलत असतं…. एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते.
असंच एक वेगळ्या प्रकारचं माझं आजचं निरीक्षण आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची आज कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या की, या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती.
सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचं समजलं. शिवाय अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फायली मंजूर होत असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचं समजलं. ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत?, असा प्रश्न उपस्थित करत रोहित पवार यांनी भाजपला चिमटा काढला आहे.
भिमाशंकरचं ज्योर्तिंलिंग हे सहावे नसून ते आसाममध्ये आहे, असा अजब दावा आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे राज्यात बदला घेण्याचा कट आखण्यासाठी गुवाहाटीला जाऊन आसामच्या मुख्यमंत्र्यांचा पाहुणचार घेणारे सदर दाव्याचा कसा बदला घेतात,याची महाराष्ट्र वाट पाहत आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत. तसेच आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पाठवल्यावरून निशाणा साधला आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी फॉक्सकॉन गुजरातला नेला. त्याचप्रकारे कर्नाटक विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागाचा प्रश्न पुढे आणला. मध्यप्रदेशात काही प्रोजेक्ट सुरू झाले त्यातील काही महाराष्ट्रात येणार होते. महाराष्ट्राचे यापुर्वीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काही पराक्रम केले हे आपण पाहिलेलंच आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीपुर्वी देवेंद्र फडणवीस बोलेले होते की, राष्ट्रवादीसोबत जाणार नाहीत. राष्ट्रवादीसोबत चर्चा देखील करणार नाही. देवेंद्र फडणवीसांसारख्या मोठ्या नेत्याच्या अशा दुटप्पी भूमिकेमुळे मला आश्चर्य वाटत आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला शिंदे गटाचा कोणताही फायदा होणार नाही. फक्त सध्या लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस वक्तव्य करत आहेत, असंही रोहित पवार म्हणाले. जेव्हा शिवसेना फुटली होती त्यावेळेस शिवसेना फोडण्यात आमची कोणतीही भूमिका नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. मात्र, भाजपा शिंदे गटाने सरकार स्थापन केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व खुलासा केला, असा दाखला रोहित पवार यांनी दिला.