देशाची घटनाच गोठवण्याचा प्रयत्न होतोय; संजय राऊतांचा घणाघात
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत तुरुंगात असताना शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आलं. यावरून संजय राऊतांना विचारले असता संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. या देशाची घटनाच गोठवण्याचा प्रयत्न होतोय, असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीवरून शिंदे आणि ठाकरे गटात कलगीतुरा रंगला होता. शिवसेना नाव आणि चिन्हावर दोन्ही गटाने दावा केल्याने सर्वोच्च न्यायालयाने नाव आण चिन्हच गोठवलं. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपुरतं नाव आणि चिन्ह गोठवण्यात आलं. या काळात संजय राऊत तुरुंगात होते. याबाबत त्यांना आजच्या पत्रकार परिषदेत विचारलं असता, या देशाची राज्य घटनाच गोठवली जातेय, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. या देशाची घटनाच गोठवण्याचा प्रयत्न होतोय. आपल्या देशाची पवित्र राज्यघटना आहे. आमच्यासारख्यांना बेकायदेशीर अटक होणं हे राज्यघटना गोठवण्याचाच प्रकार आहे. राज्यघटनेला या देशात किंमत नाही, असंही संजय राऊत म्हणाले.
मला खात्री होती माझ्या कुटुंबाची हे काळजी घेतील. म्हणणून मी तुरुंगात गेलो. आमच्या शिवसेनेसाठी मला १० वेळा तुरुंगात पाठवलं तरी मी जायला तयार आहे. पक्षासाठी त्याग करण्याची वेळ येते, ती जर तयारी नसेल तर ४० वर्षांत पक्षाने जे दिलंय त्यासाठी मी कृतघ्न ठरलो असतो, असं संजय राऊत म्हणाले.
फडणवीस राज्य चालवत आहेत, बाकी उंडारत आहेत
आर्थर रोड तुरुंगातून बाहेर यायला मला अडीच तास लागले. टीव्ही बघून लोक रस्त्यावर उतरले. शिवसेना महाराष्ट्रात एकच आहे. गट वगैरे नाही. ज्याचं नेतृत्त्व उद्धव ठाकरे करत आहेत. कटुता कमी करण्याचं वक्तव्य जर उपमुख्यमंत्र्यांनी केलं असेल तर महाराष्ट्राच्या परंपरेला हे शोभणारं आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती आहे. आम्ही राजकीय लढाया करतोय. राज्य ते चालवत आहेत. राज्य तेच चालवत आहेत, बाकी उंडारत आहेत. काही प्रश्न माझ्यासमोर आले. तुरुंगात गेलेल्या माणसाला जे आयुष्य भाोगावं लागतं ते मी पाहिले, ते सर्व प्रश्न एक लोकप्रतिनिधी म्हणून मी मांडायला गेलो तर त्यात चुकी काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.