विरोधकांवर मानसिक दबावाचा प्रयत्न, खरी लढत २०२४; निकालावर प्रशांत किशोरांचे सूचक ट्विट
नवी दिल्ली | पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने दणक्यात कामगिरी केली. पक्षाला पाचपैकी चार राज्यांवर कब्जा करत दणदणीत विजय मिळवला आहे. विशेषत: युपीमध्ये ज्या पद्धतीने पक्षाचा विजय झाला आहे, त्याची चर्चा अधिक आहे. तर अलीकडच्या काळात निवडणूक रणनीतीकर प्रशांत किशोर प्रत्येक निवडणुकीनंतर भाजपविरोधात जोरदार भाषणबाजी करताना दिसत आहेत. अशावेळी आता या विजयांनंतर भाजप विरोधकांवर मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सूचक ट्विट त्यांनी केले आहे.
चार राज्यांमध्ये भाजपच्या दणदणीत विजयानंतर प्रशांत किशोर यांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील सत्तेची खरी लढाई २०२४ मध्ये लढली जाईल, कोणत्याही राज्याच्या निवडणुकांद्वारे नाही असेही त्यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे. प्रशांत किशोर यांनी ट्विट करून लिहिले की, ‘देशाची लढाई २०२४ मध्येच लढली जाईल आणि ठरवली जाईल, ती कोणत्याही राज्याच्या निवडणुकीच्या निकालांवर ते भविष्य ठरवली जाणार नाही. त्यामुळे चतुराईने विरोधकांवर मानसिक दबाव आणायचा हा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे विजयाचा उन्माद करुन विरोधकांवर जो दबाव आणायचा प्रयत्न होत आहे या चतुराईला आणि होत असलेल्या अशा फसवणुकीला बळी पडू नका आणि त्याचा भागही बानू नका, असे सूचक ट्विट त्यांनी केले आहे.
दरम्यान, विशेषत: युपीमध्ये ज्या पद्धतीने पक्षाचा विजय झाला आहे, ते अधिक महत्वाचे मानले जात आहे. त्याची चर्चा देखील आहे. २०२४ च्या निवडणुकीत यूपीमध्ये विजयाचा फायदा पक्षाला मिळेल, असे अनेक तज्ज्ञांचे मतही आहे. गेल्या वर्षी बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यात किशोर यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील काही नेत्यांसोबत किशोर यांचे मतभेद झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र आता ही नाराजी दूर झाल्याचे बोलले जात आहे. टीएमसीने पुन्हा एकदा प्रशांत किशोर यांच्याशी निवडणूक सल्लागार म्हणून करार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे