ATM : फक्त १५ दिवसांत ४५ हजार कोटी काढले
नवी दिल्लीः देशातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख चलनाचा तुटवडा असल्याचं वृत्त येतंय आहे. यानंतर केंद्रीय अर्थमंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. गेल्या १३ दिवसांत सामान्यपेक्षा तीन पटीने अधिक रोख रक्कम एटीएममधून काढण्यात आली आहे, अशी माहिती अर्थ सचिव एस. सी. गर्ग यांनी दिली. रोख चलनाच्या तुटवड्यानंतर ५०० रुपयांच्या नोटेची छपाई पाच पटीने वाढवण्यात आल्याचंही गर्ग यांनी सांगितलं.
सर्वसाधारणपणे महिन्याला २० हजार कोटी रुपये व्यवहारात येतात. पण या महिन्यात फक्त १२ ते १५ दिवसांच्या कालावधीत तब्बल ४५ हजार कोटी रुपये काढण्यात आले आहेत. तरीही सरकारकडे रोख रकमेची कुठलीही कमतरता नाही. सरकारकडे सध्या २ लाख कोटी रुपयांचे भांडार आहे, असं गर्ग यांनी सांगितलं. तसंच रोख रकमेचा तुटवडा तीन दिवसांत दूर करण्यात येईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे.
दररोज ५०० कोटी रुपयांच्या ५०० च्या नोटा छापण्यात येत आहेत. आता आम्ही या छपाईत पाच पटीने वाढ केली आहे. यानुसार दररोज पाचशे रुपयांच्या अडीच हजार कोटींच्या नोटा छापल्या जातील. यामुळे एका महिन्यात ७० ते ७५ हजार कोटी रुपये व्यवहारात येतील, असं गर्ग यांनी स्पष्ट केलं.