breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

निकषात नसणाऱ्या अवकाळी बाधित शेतकऱ्यांनाही मदत ; पुढील खरीप हंगामापूर्वी मदतीच्या निकषांत बदल

मुंबई |

राज्यात गेल्या काही महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या पण मदतीच्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही विशेष बाब म्हणून सुमारे १४०० कोटींची मदत देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून त्याबाबत लवकरच निर्णय होईल. तसेच पुढील खरीप हंगामापासून मदतीच्या निकषामध्ये बदल करून तीन दिवसांत १०० मिलिमीटर पाऊस होऊन झालेल्या नुूकसानीचीही शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. जालना जिल्हयात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊनही शेतकऱ्यांना मदत नाकारण्यात आल्याबद्ल नारायण कुचे व अन्य सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या चर्चेदरम्यान वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. खरीप हंगामामध्ये मराठवाडय़ात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाप्रमाणे आतापर्यंत तीन हजार ८८५ कोटींची मदत देण्यात आली आहे.

मात्र या निकषानुसार २४ तासांत ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस आणि ३३ टक्केपेक्षा अधिक पिकांचे नुकसान हे निकष पूर्ण न करणाऱ्यांना मदत दिली जात नाही. जालना जिल्ह्यात अशाच पद्धतीने निकषात न बसणाऱ्या मात्र शेतीचे नुकसान झालेल्या ३३ हजार ३०५ बाधित शेतकऱ्यांच्या २४ हजार २९३ हेक्टर क्षेत्रासाठी विशेष बाब म्हणून १७ कोटी २८ लाख रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारकडे पाठविला होता. मात्र तो निकषात बसणारा नसल्याने फेटाळण्यात आल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. त्यावर सदस्यांनी पर्जन्यमापक यंत्रच बंद असल्याने तसेच पंचनामे वेळेवर न झाल्याने या शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप केला. पुढील हंगामापासून किमान राज्याच्या आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषामध्ये बदल करून किमान तीन दिवसांत १०० मिमी पाऊस झाला आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी मदत देण्याची तरतूद लागू केली जाईल ,असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button