ईडीकडून संपत्ती जप्त, मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा संजय राऊत यांना फोन
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या निशाण्यावर असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. अलिबाग आणि दादरमधील राऊतांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आलेली आहे. आलिबागमधील ८ भूखंड आणि दारमधील राहता फ्लॅट ईडीने सील केला आहे. 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीच्या कारवाईनंतर राऊतांनी आक्रमक प्रतिक्रिया नोंदवत मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. अशा कारवाईने मी किंवा सेना खचणार नाही. कारवाईनंतर मला शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांचा फोन आला. माझं त्यांच्याशी कारवाईच्या अनुषंगाने बोलणं झालं, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
संजय राऊतांची संपत्ती जप्त
गोरेगावमधील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्याआधारे ईडीने संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. पत्राचाळ जमीन प्रकरणात १०३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाला. यापैकी काही पैसे संजय राऊत यांना मिळाले होते. याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा आरोप आहे. या भूखंडांची किंमत साधारण ६० लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. तसेच स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्यात आले, असाही आरोप आहे.
बाळासाहेबांचा सैनिक घाबरणार नाही
कारवाईनंतर संजय राऊत अतिशय आक्रमक झाले होते. भाजपवर हल्ला चढविताना अशा कारवायांना मी भीक घालत नाही. अशा कारवायांनी मी घाबरेन, असा भाजपचा गैरसमज आहे. मी बाळासाहेबांचा निष्ठावंत सैनिक आहे. माझ्या अंगात सेनेचं रक्त आहे. त्यामुळे मी घाबरत नाही. सरकार पाडण्यासाठी आधी माझ्यावर दबाव होता. आता प्रत्यक्ष कारवाई केलीय. माझ्या हत्येचा, हिरेन पांड्या करण्याचा संबंधितांचा प्लॅन आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा संजय राऊत यांना फोन
“ईडीच्या कारवाईनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फोन केला. दोघांशीही माझं बोलणं झालं. कारवाईच्या अनुषंगाने त्यांनी विचारपूस केली. माझ्या पक्षातील अनेक सहकाऱ्यांचे मला फोन आले. मी त्यांना इतकंच सांगितलं, मी घाबरत नाहीत, मौनात मी नाही आता भाजप जाईल”, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
…तर मी समाजकारण, राजकारण सोडून देईल!
माझ्यावर झालेले आरोप जर सिद्ध झाले तर मी समाजकारण, राजकारण सोडून देईल, असं म्हणत आपल्यावरील सगळे आरोप संजय राऊत यांनी फेटाळले. 2009 साली आमच्या कष्टातून घेतलेली जागा आणि घरावर ईडीने कारवाई केली. आधी कधीच कुणी आमची चौकशी केली नाही. विचारणा केली नाही. माझी मालमत्ता जप्त केल्याचं आता मी टीव्हीला पाहिलं. एक रुपया जरी मनी लॉन्ड्रिंगचा आमच्या खात्यात आला असेल आणि आम्ही प्रॉपर्टी घेतली असेल तर आम्ही सर्व प्रॉपर्टी भाजपला दान करू, असं संजय राऊत म्हणाले.
ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत LIVE
- ईडी माझ्या मगे लागलीय, याची मला पूर्ण कल्पना होती
- ईडीने केलेल्या कारवाईचं मला आश्चर्य वाटत नाही
- सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव होता
- कष्टाने कमावलेली संपत्ती ईडीने जप्त केली आहे
- अक रुपया जरी अवैध मार्गाने माझ्या खात्यावर आला असेल तर सगळी संपत्ती भाजपला दान करु
- सूडाच्या कारवाईने मला फरक पडत नाही
- ५५ लाखांचा कर्ज होतं, याची प्रतिज्ञापत्रात माहिती दिली होती
- आरोप सिद्ध झाले तर राजकारण करेन
- ईडीने जप्त केलेल्या फ्लॅटमध्ये माझं कुटुंब राहतं
- ईडीच्या कारवाईला सामोरं जाण्यासाठी आम्ही खंबीर आहोत