खोक्यांवरून माफी मागा, अन्यथा न्यायालयात खेचणार!; शिंदे गटाचा शिवसेना, राष्ट्रवादीला इशारा
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील ५० आमदारांवर प्रत्येकी ५० कोटी घेतल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आरोप करणारऱ्यांनी एकतर माफी मागावी नाहीतर त्यांना न्यायालयात खेचणार आहे. विरेधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात २५०० कोटी रूपयांचा अब्रुनुकसान भरपाईचा दावा ठोकणार असल्याची घोषणा बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत केली.
मंत्री अब्दुल सत्तारांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे.५० खोक्यांच्या प्रश्नावर बोलताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. यानंतर विरोधकांकडून सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी होत असून, त्यांना मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करावी या मागणीला जोर धरत आहे. यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवतारे यांच्या विधानावर बोलताना म्हटले आहे की , याबाबत मी आरोप केला नाही तर राज्यातील सर्व जनता बोलत आहे, असे म्हटले आहे.