विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी : उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे – एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्रास झाला याबाबत दुमत नाही, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केलं आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब लक्ष घातलं आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यामुळे एमपीएससीने नवीन परिपत्रक काढल्याचंही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “एमपीएससी ही स्वायत्त संस्था असून या विषयावर विरोधकांनी राजकारण करायची गरज नव्हती. सरकार काहीतरी वेगळं करतंय असं भासवण्याचं काम विरोधकांनी केलं असून ते चुकीचं आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घातलं आणि एमपीएससीला सूचना केल्या. त्यानुसार आज एमपीएससीने नवीन परिपत्रक काढलं आहे.”
वाचा ;-एमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर
अजित पवार म्हणाले की, “एमपीएससीने हे प्रकरण व्यवस्थित हाताळायला हवं होतं. त्यामध्ये एमपीएससी कुठंतरी कमी पडली. या प्रकरणी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरायची वेळ आली हे दुर्दैवआहे. कोणतंही कारण नसताना विरोधक रस्त्यावर उतरले, या प्रकरणात विरोधकांनीही राजकारण केलं तेही दुर्दैव आहे.”
लोकसेवा आयोगाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार 21 मार्चनंतर होणाऱ्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्चला होणार आहे. तर 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.