‘राजकारणात काहीही होऊ शकतं, उद्या पटोलेही आमच्यासोबत येतील’
मुंबई |
मागील काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या प्रकरणावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेत महाविकास आघाडीवर निशाणा साधलेला आहे. भाजप नेते सातत्याने सरकार पडणार असल्याचा दावा करत आहेत. सोबतच, राज्यात राष्ट्रपती राजवटीची देखील मागणी करत आहेत. अशात आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं. काँग्रेस नेते नाना पटोले उद्या आमच्यासोबतही येऊ शकतात, असे रामदास आठवलेंनी म्हटले आहे.
हे सरकार पाच वर्षे टिकणार नाही. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ठाकरे सरकार लवकर जावं ही आमची इच्छा आहे, असे आठवले म्हणाले आहेत. सांगली येथे एका कार्यक्रमानिमित्त रामदास आठवले आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. यावेळी बोलताना राष्ट्रपती राजवटीविषयी ते म्हणाले की, कायदा सुव्यवस्था बिघडत राहिली तर नाईलाजाने राष्ट्रपती राजवटीचा विचार करावा लागेल. याआधी ‘गो कोरोना गो’चा नारा दिला होता. आता जगातूनच कोरोना हद्दपार व्हावा म्हणून ‘नो कोरोना नो’चा नारा देत आहे, असेही ते म्हणाले आहेत.
वाचा- सचिन वाझेंना पोलीस दलात घेण्यासाठी शिवसेनेने माझ्याकडे आग्रह केला होता, फडणवीसांचा गौप्यस्फोट