पुढील दीड महिना चिंता मिटली! मुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ
मुंबई – मुंबईत मागील चार-पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुढील दीड महिना मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार, भातसा या सात धरणांचा समावेश होते. या धरणांतून मुंबईला दररोज तीन हजार 800 दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा होतो. गेल्या चार दिवसांपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे मुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. आता तलावांमध्ये एकूण एक लाख 85 हजार 981 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जुलैपर्यंत पुरेल एवढा आहे.
तलावांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
मोडकसागर – 43,393
तानसा – 18,827
मध्य वैतरणा – 26, 676
भातसा – 81,684
विहार – 14,176
तुळशी – 4,217