भाजपात गेलेल्या आणखी एका महिला नेत्याला पुन्हा तृणमूलमध्ये यायचंय
कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी लढत पाहायला मिळाली. विधानसभा निवडणुकीच्या आधी तृणमूलमधील अनेक नेते भाजपाच्या गळाला लागले. मात्र तरीही पश्चिम बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जी यांनाच तिसऱ्यांदा सत्तेत बसवले. त्यानंतर आता ममता बॅनर्जींच्या नेतृत्त्वाखालील सरकार कामाला लागल्यानंतर चक्क भाजपात गेलेल्या मूळच्या तृणमूलमधील नेत्यांना पुन्हा पक्षात परतण्याचे वेध लागले आहेत. चार वेळा आमदार राहिलेल्या ममता बॅनर्जी यांच्या वर्तुळातील सोनाली गुहा यांनी भाजपात प्रवेश करून चूक केल्याची कबूली ममतांना लिहिलेल्या पत्रात दिल्यानंतर आता आणखी एका महिला नेत्याने हीच इच्छा व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीआधी भाजपात दाखल झालेल्या सरला मरमू यांनी ममतांची माफी मागितली असून भाजपात प्रवेश करण्याची चूक केली, असे म्हटले आहे.
रविवारी माध्यमांशी बोलताना मरमू म्हणाल्या, ‘मी चूक केली. मी ममता बॅनर्जी यांची माफी मागते. मला आशा आहे की, त्या मला माफ करतील. जर त्यांनी मला पुन्हा स्वीकारले, तर मी त्यांच्यासोबत राहिन आणि प्रामाणिकपणाने पक्षाचे काम करेन.’ दरम्यान, मरमू यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. तृणमूल काँग्रेसने त्यांना तिकीट दिलेले असतानाही त्या भागात दाखल झाल्या होत्या.