प्रसारमाध्यमांकडे खुलासा करण पडले मनपा अधिकाऱ्याच्या अंगलट, न्यायालयाची नोटीस
अहमदनगर : न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लेखी म्हणणे थेट प्रसार माध्यमाना सादर केल्याचा प्रकार त्यांच्या अंगलट आला आहे. त्यांची ही कृती न्यायालयाचा अवमान करणारी असल्याने यासंबंधी न्यायालयाने नोटीस बजावली आहे. त्यावर २३ जुलै रोजी म्हणने सादर करण्यासाठी हजर राहण्याचा आदेश जिल्हा न्यायाधीश सुधाकर येरगडल्ला यांनी दिला आहे. मूळ तक्रारदार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी ही गोष्ट न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. महानगरपालिकेमध्ये घनकचरा विभागामध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरप्रकार झाल्याची याचिका जाधव यांनी दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार येथील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे.
यासंबंधीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर महानगरपालिकेचे प्रभारी घनकचरा विभाग प्रमुख किशोर देशमुख यांनी लेखी म्हणणे प्रसार माध्यमांचाकडे दिले. यासंबंधी जाधव यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. जाधव यांनी आज त्यांचे वकील अभिजीत पुप्पाल यांच्या मार्फत न्यायालयामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे व प्रभारी अधिकारी किशोर देशमुख यांनी न्यायालयाचा अवमान केला म्हणून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी या करता याचिका दाखल केली होती.
वकील अभिजीत पुप्पाल यांनी बाजू मांडताना किशोर देशमुख यांना खुलासा करण्याचे कोणतेही कारण नव्हते. ते या संदर्भातला खुलासा करू शकत नाहीत. त्यांना तसे अधिकार पण नाहीत. याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिकेच्या आयुक्तांवर असते. त्यांनी न्यायालयाची व जनतेची दिशाभूल करून डोळ्यांमध्ये धूळफेक करत केलेला खुलासा हा न्यायालयाचा अवमान करणारा आहे. त्यामुळे या सर्वांवर तात्काळ कारवाई करावी असा युक्तिवाद केला. न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी किशोर देशमुख यांना २३ जून रोजी लेखी म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला.