तालिबानी प्रवक्त्याची मुलाखत घेणाऱ्या अफगाणी महिला अँकरनं सोडला देश
नवी दिल्ली |
अफगाणिस्तानमधील टोलो न्यूज चॅनेलनं १७ ऑगस्टला तालिबान प्रवक्ता मौलवी अब्दुलहक हेमाद याची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत घेणारी महिला अँकर बेहेशता अरघंद नंतर चांगलीच चर्चेत आली होती. तालिबानच्या प्रतिनिधीची थेट टीव्हीवर महिला अँकरने बसून मुलाखत घेण्याची ही पहिलीच वेळ होती. हे सर्व सांगायचं कारण म्हणजे तालिबानी प्रवक्त्याची निर्भिडपणे मुलाखत घेणाऱ्या २४ वर्षीय बेहेशताने तालिबानच्या भीतीने देश सोडला आहे. बेहेशता अरघंद तिच्या पत्रकारितेच्या करिअरच्या शिखरावर होती. नववीत असल्यापासून पत्रकार बनण्याचं तिचं स्वप्न होतं. मात्र, तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तिने करिअर आणि देश सोडून दिला आहे. सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी देश सोडला कारण लाखो लोकांप्रमाणे मलाही तालिबानची भीती वाटते. जर तालिबानने जे वचन दिलंय त्याप्रमाणे ते वागले आणि देशातील परिस्थिती चांगली झाली, मला वाटेल की मी अफगाणिस्तानमध्ये सुरक्षित आहे आणि माझ्यासाठी कोणताही धोका नाही, अशावेळी मी माझ्या देशात परत जाईन. मी माझ्या देशासाठी आणि माझ्या लोकांसाठी काम करेल.”
तालिबान प्रवक्ता मौलवी अब्दुलहक हेमाद यांच्यासोबतच्या मुलाखतीबद्दल बोलताना बेहेशता म्हणाली, “मुलाखत अवघड होती, पण मी ती अफगाणी महिलांसाठी घेतली होती. आम्हाला आमचे हक्क हवे आहेत. आम्हाला काम करायचंय, आम्हाला समाजात वावरायचंय आणि तो आमचा हक्क आहे,” असं तालिबान्यांना म्हटल्याचं बेहेशता सांगते. तसेच “जर भीतीने आम्ही घराबाहेर पडलो नाहीत, तर आम्हालाच काम करायचं नाही, असं ते जगासमोर म्हणतील. मात्र, आम्हाला भीती वाटते,” असं बेहेशता म्हणाली. टोलो न्यूजचे मालक साद मोहसेनी यांनी बेहेशता अरघंदच्या परिस्थितीला तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानात जे घडतंय, त्याचं प्रतिबिंब म्हटलंय. ते म्हणाले, “आमच्या जवळजवळ सर्व नावाजलेल्या पत्रकारांनी देश सोडलाय. त्यांच्या जागी आम्ही नवीन लोक शोधण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला आमचं काम सुरू ठेवायचंय, तसेच ज्या लोकांना देशात असुरक्षित वाटतंय त्यांना बाहेर काढण्याचं दुहेरी आव्हान आमच्यासमोर आहे,” असे मोहसेनी सीएनएनशी बोलताना म्हणाले.