शिवसेना व वंचित यांच्या युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतो कुठे?; अजित पवार
उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आमची भूमिका मांडू
मुंबई : शिवसेना व वंचित युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतो कुठे? का गैरसमज पसरवत आहात, असा थेट सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांना केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक प्रदेश कार्यालय पार पडल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर वंचितने युती केली हे माध्यमांमधून समजले आहे. उद्धव ठाकरे यांची आज मी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील भेट घेणार आहोत. त्यावेळी यावर स्पष्टपणे चर्चा करु व त्यानंतर आमची भूमिका मांडू. उद्धव ठाकरे यांनी कुणाला मित्रपक्ष म्हणून घ्यायचं व त्यांच्या कोट्यातून घ्यायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे, असे अजित पवार म्हणाले.
मागच्या निवडणुकीत कुणी जागा पाडल्या याला राजकारणात काही अर्थ नसतो. राजकारणात आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आराखडे आखावे लागतात व राजकीय भूमिका मांडावी लागते. युती-आघाडी होते त्यावेळी ‘मागचं झालं गेलं गंगेला मिळालं’ असं करुन पुढे गेलो तरच योग्य गोष्टी घडतात, असं अजित पवार म्हणाले.
चिंचवड आणि कसबा या दोन्ही जागांसंदर्भात पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली. आघाडीतील शिवसेना, काँग्रेस या पक्षांसोबत चर्चा करतोय. याशिवाय जे घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन या निवडणुका लढवल्या जाव्यात ही भूमिका असून याबाबत अंतिम निर्णय झाल्यावर माध्यमांना सांगू, असेही अजित पवार म्हणाले.