उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे हजार कोटी रुपयांची बेनामी संपत्ती; किरीट सोमय्यांचा आरोप
मुंबई |
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांकडे हजार कोटी रुपयांची बेनाम संपत्ती आहे. त्याचा त्यांनी हिशोब द्यावा अशी मागणी सोमय्या यांनी केलीय. मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये सोमय्या यांनी पवार कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. आपण दिवाळीनंतर आपण बॉम्ब फोडणार आहोत असं काही सोमय्या यांनी म्हटलं होतं. मात्र आज राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील ड्रग्ज कारभाराचे मास्टर माइंड म्हणत टीका केल्याने आपण आजच बॉम्ब फोडल्याचं स्पष्टीकरण सोमय्या यांनी दिलं आहे.
समीर वानखेडेंसारख्या दलित कर्मचाऱ्याला विनाकारण ड्रग्ज प्रकरणामध्ये अडकवलं जात आहे. त्यांना कारण नसताना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप करतानाच पवार कुटुंबाने महाराष्ट्राला लुटलं आहे असं सोमय्या म्हणालेत. अजित पवारांकडे १ हजार ५० कोटींची संपत्ती आली कुठून?, यासंदर्भात अजित पवारांनी माहिती द्यावी अशी मागणी सोमय्या यांनी केलीय. घोटाळ्याचे सर्व पैसे पवार कुटुंबाकडे जातात असा आरोपही सोमय्या यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच असल्याचा दावाही सोमय्या यांनी केलाय. एवढं गलिच्छ राजकारण शरद पवार आणि उद्धव ठाकरेच करु शकतात, असं म्हणत सोमय्या यांनी महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांवर निशाणा साधलाय. तसेच कालच शरद पवार यांचा उल्लेख करत दाऊद कनेक्शनसंदर्भात बोलणाऱ्या सोमय्या यांनी बाळासाहेबांची भाषणं नीट ऐकली तर दाऊद कनेक्शन कळेल असंही म्हटलं आहे.
- राऊत यांनी दिला इशारा
दरम्यान यापूर्वी आज सकाळी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांना इशारा दिलाय. सोमय्या यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या आरोपांवर बोलताना राऊत यांनी, पवार राष्ट्रीय नेते त्यांच्या आरोप करताना भाजपा नेत्यांना लाज वाटली पाहिजे, असं मत व्यक्त केलं. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारु नये. आमच्या हाततही दगड आहेत, असंही राऊत म्हणाले. आम्ही अजून संयम बाळगला आहे, असंही राऊत यांनी सांगितलं. तसेच समोरच्याला हे करण्याची इच्छा असेल तर वाईट पातळीवर जाईल.