उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर
पुणे – अजित पवार यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर करण्यात आली. अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मदतीची घोषणा केली.या वेळी अजित पवार म्हणाले, पुरग्रस्तांना गव्हाऐवजी तांदूळ, डाळ आणि रॉकेल दिले जाणार आहे. हेलिकॉप्टरमधून बोटीनं डाळ, तांदूळ व पाण्याच्या बाटल्या पोहोचवल्या जातील. पूरग्रस्तांना अन्नधान्य व पिण्याचे पाणी पोहोचवण्यास सरकारचं प्राधान्य आहे.
पूरग्रस्तभागात शिवभोजन केंद्रांची संख्याही वाढवली जाईल. या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर निर्णय घ्यावेत, आदेशाची वाट पाहू नये, अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.राज्यात आतापर्यंत ७६ मृत्यू झाले असून, ५९ लोक बेपत्ता आहेत, तर ३८ जखमींवर उपचार सुरू आहेत.७५ जनावरेही दगावली आहेत. राज्यातील ९० हजारांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
लष्कर, नौदल, हवाई दल, एनडीआरएफची मदत मिळत असून, मुख्यमंत्र्यांसह आपण स्वत: संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. हवामान विभागाचे बरेचसे अंदाज आता खरे ठरताहेत.वशिष्ठी नदीवरील पूल कोसळल्याने पर्यायी रस्त्याचे काम वेगाने करणार. सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यातच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले.
लष्करी मदतीसाठी आपण स्वत: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संवाद साधला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. आपत्तीग्रस्तांचा बचाव, मदत व पुनर्वसनाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असेल, असेही अजित पवार यांनी सांगितले.प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा, एनडीआरएफ, लष्कर, नौदल, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहकार्यानं युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य करीत आहेत.
मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना
जिल्हा प्रशासनाने स्थानिक नागरिक व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने आपत्तीग्रस्त नागरिकांना निवारा, खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी, औषधे आदी मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही पवार यांनी दिल्या.संरक्षण मंत्रालयाशी समन्वयासाठी नोडल ऑफिसर म्हणून मदत व पुनर्वसन सचिव असिम गुप्ता यांच्यावर जबाबदारी आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिवांकडून सातत्याने आपत्कालिन स्थितीचा आढावा घण्यात आला. स्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा न सोडण्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधींना सूचना देण्यात आल्या आहेत, असे पवार यांनी सांगितले.