शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरीही मिळणार शाळेत प्रवेश; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!
मुंबई – शाळा सोडल्याचा दाखला असेल तरच आतापर्यंत दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश मिळत असायचा. परंतु, आता महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने यासंदर्भात एक मोठा निर्णय घोषित केला आहे. ज्यानुसार शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय आता दुसऱ्या शाळेत प्रवेश घेता येणार आहे.
दरम्यान, शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार अनेक शाळा या विद्यार्थ्यांनी शाळेचे शुल्क न भरल्याने दाखला देण्यासाठी अडवणूक करत असल्याचं निदर्शनास आल्यामुळे आता जन्माचा दाखला पाहून संबंधित विद्यार्थ्याच्या वयानुसार त्याला पुढील वर्गात थेट प्रवेश देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे पालकांसह विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे इथून पुढे आता शाळा सोडल्याचा दाखला दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतेवेळी बंधनकारक असणार नाही. शाळेची फीस न भरल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची अडवणूक करणाऱ्या शाळांना या निर्णयामुळे चांगलीच चपराक बसली आहे.
शिक्षण विभागाच्या या निर्णयाचं महाराष्ट्रभरातील पालकांनी स्वागत केलं आहे. तसेच आता पालकांची व विद्यार्थ्यांची पिळवणूक काही प्रमाणात कमी होणार असल्याचं पाहायला मिळत आहे.