ताज्या घडामोडी

वडिलांचा आदर्श घेत सायकलवर भारतभ्रमण करणारा एक ध्येयवेडा

नाशिक | भर दुपारी रणरणत्या उन्हात, चेह-यावर घामाच्या ओघळणाऱ्या धारा, सिनेमाच्या पात्राप्रमाणे डोक्यावर गोल हॅट घातलेला सायकलस्वार तरुण वैश्विक शांतता, पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन शहराची वेस ओलांडून पेठ नगरीत दाखल झाला. त्याने सहजच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या पेठ मुक्कामात साधलेल्या संवादातून ध्येयवेड्या तरुणाच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू समोर आले.

झारखंड राज्यातील जमशेदपूर (कदमा) येथील सत्तावीस वर्षीय आधिराज बरूआच्या आईचं २ वर्षांपूर्वी निधन झालं, वडिलांसोबत राहणारा एकुलता एक लाडकी लेक. वडिलांच्या रंगकाम आणि इंटेरियर डिझाईनच्या कामात हातभार लावणारा तरुण. गेल्या ६ महिन्यांपासून सायकलवर स्वार होत भारत भ्रमण करत आहे. ओरिसा, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, गोवा या राज्यातील सुमारे ७ हजार किलोमीटरचा अविरत प्रवास करत तो महाराष्ट्र राज्यात दाखल झाला आहे. सायकलला राष्ट्रध्वज आणि शांततेचं प्रतीक असलेला पंचरंगी ध्वज लावून मार्गावर येणाऱ्या शहरासह गावखेड्यातील नागरिकांना प्रबोधनाच्या माध्यमातून अधिराज शांततेचा संदेश देतच जात आहे.

साधा आणि सोजवळ स्वभाव…

आधिराजच्या सायकलवर दैनंदिन वापराच्या मोजक्या काही वस्तू, दोन जोडी अंगावर कपडे, एक गोल टोपी, मोबाईल, एक अंथरुण आणि एक मच्छरदाणी एवढा लवाजमा आहे. तो दिवसभरात सुमारे ८० ते १०० किमी प्रवास सहज करतो. आज भर दुपारी नाशिक-पेठ अंतर सायकलचा प्रवास करुन थकलेला असतानाही स्व:ताची ओळख व ध्येय सांगताना त्याच्या चेह-यावरचे तेज पाहण्यासारखे होते. अतिशय नम्रपणे निघणारे त्याचे हिंदी भाषेतील उच्चार वाखाणण्याजोगे होते. एवढ्या मोठ्या खडतर प्रवासात समोर येणाऱ्या कोणत्याही संकटावर मात करत पुढे जाण्याची त्याची तयारी आणि आत्मविश्वास भारावून टाकत होता. आजवरच्या प्रवासातील अनेक अविस्मरणीय अनुभव त्याने कथन केले. प्रवासात ठिकठिकाणी लोकांकडून मिळणारा चांगला प्रतिसाद हीच त्याची उर्जा बनत होती.

अधिराजचा पुढील प्रवास…

महाराष्ट्रानंतर तो गुजरातकडे प्रस्थान करणार आहे. मग मध्यप्रदेश, राजस्थान तेही ऐन उन्हाळाच्या मे महिन्यात. राजस्थान तेही भर उन्हाळ्यात? हा प्रश्न विचारताच त्याच्या तोंडून ‘भैय्याजी, इतना दूर तक आ चुका हूँ, तो अब वह भी पार कर लैंगेही!’ हे सकारात्मकतेने भरलेलं त्याचं वाक्य. शरीराने काहीसा थकलेला आधीराज रात्री वेळेत झोपी गेला खरं. पण पाचच्या ठोक्याला उठून व्यायाम करु लागला. अंघोळ आटोपून आपल्या सगळ्या गरजेच्या वस्तू सावरत, संदेशाचा फलक, राष्ट्रध्वज व शांतीचे प्रतिक पंचशील ध्वजासह सायकलवर स्वार होत पहाटेचं तांबडं फूटण्याआधी नव्या उमेदीसह गुजरातच्या दिशेने रवाना झाला.

आधिराजचे वडील आलोकरंजन बरूआ यांनी १९८७ साली वयाच्या बाविसाव्या वर्षी सायकलवर भारतभ्रमण केले होते. त्यामुळे अनेक ऐतिहासिक ठिकाणांच्या ३५ वर्षांपूर्वी वडिलांनी ज्या जागी उभं राहून अनेक छायाचित्र घेतले त्याच ठिकाणी स्वतः चे छायाचित्रे घेताना आधिराजला खूप आनंद होतो. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आणि वडिलांचा आदर्श घेत आधिराज सायकलवर भारतभ्रमण करत आहे.

‘सदावर्तेंबाबत माहिती नाही, पण अजय कुमार गुजरांना दिले होते पैसे’, एसटी कर्मचाऱ्याकडून मोठी पोलखोल

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button