लोकअदालतीच्या सुनावणीपूर्वी ५७ कोटींचा दंड वसूल
मुंबई | ई-चलानच्या थकीत दंडाची रक्कम वसुल करण्यासाठी महाराष्ट्र महामार्ग पोलिसांनी लोक अदालतमध्ये धाव घेतल्यानंतर राज्यभरातून सुमारे ५७ कोटी १५ लाख रुपयांची थकीत दंडाची रक्कम जमा झाली आहे. लोक अदालतपूर्वी राज्यभरातील सुमारे ८० लाख ६६ हजार वाहनांच्या मालकांना नोटीस बजावून थकीत दंड भरण्यास सांगितले होते. राज्यभरात सुमारे ९९६ कोटींची ८५ लाख रुपये दंडाची रक्कम थकली आहे.
महामार्ग वाहतुक पोलिसांनीही २०१९ मध्ये ई चलान यंत्रणा कार्यान्वित केली होती. त्यातील थकीत रक्कम वाढल्यामुळे महामार्ग वाहतुक पोलिसांचे कर्मचाऱ्यांनी चालकांच्या घरी जाऊन चालकांना दंडाची रक्कम भरण्यास सांगितले होते. त्यानंतरही अनेक वाहन चालकांनी दंडाची रक्कम न भरल्यामुळे महामार्ग वाहतुक पोलिसांनी याप्रकरणी लोक अदालतीमध्ये धाव घेतली. त्यासाठी ८० लाख ६६ हजार वाहनांच्या मालकांना मोबाइलवरून संदेश पाठवून लोकअदालतीच्या सुनावणीपूर्वी (१२ मार्चपूर्वी) दंडाची थकीत रक्कम भरण्यास सांगण्यात आले होते. त्या भीतीने ११ लाख ६० हजार थकीत ई..चलानमधील ५७ कोटी १५ लाख रुपयांची दंडाची रक्कम जमा झाली आहे. लोकअदालतीनंतरही चालकांनी रक्कम भरली नाही, तर अशांवर आता महामार्ग पोलीस नियमित न्यायालयात खटला दाखल करणार आहेत. दंडाची रक्कम एक हजारांहून अधिक असलेल्या सर्व चालकांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. राज्यात सध्या दोन लाख ३६ हजार ई..चलानमधील ९९६ कोटी ८५ लाखांची दंडाची रक्कम थकीत आहे.