breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“एकनाथ शिंदेंसारखा सक्षम माणूस हे राज्य चालवू शकतो, पण…”, रावसाहेब दानवे यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

मुंबई |

भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे आजारी आहेत. ते बरे व्हायला काही दिवस तरी लागतील. अशावेळी विना प्रमुखांचं राज्य कसे चालेल? असा प्रश्न रावसाहेब दानवे यांनी विचारला. तसेच राज्यात एकनाथ शिंदे यांच्यासारखा सक्षम माणूस आहे. ते राज्य चालवू शकतात, पण तरीही त्यांच्याकडे जबाबदारी दिली जात नाही, असा आरोप दानवेंनी उद्धव ठाकरेंवर केला. रावसाहेब दानवे म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. ही गोष्ट काही सांगण्याची नाही. ते आजारातून लवकर बरे व्हावेत अशी आमच्या पक्षाची आणि माझी व्यक्तिगत भूमिका आहे. त्यांनी या राज्यातील १२ कोटी जनतेची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा उपलब्ध व्हावं, असं आमचं मत आहे. पण जर ते लवकर बरे झाले नाही तर या राज्याला प्रमुख तर नेमला पाहिजे. ते बरे व्हायला काही दिवस तर लागतील.”

“विना प्रमुखाचं हे राज्य कसं चालेल? एकनाथ शिंदेंसारखा सक्षम माणूस हे राज्य चालवू शकतो, पण तरीही त्यांच्याकडे जबाबदारी दिली जात नाही. कुणालाही द्या, राष्ट्रवादीला द्या, अजित पवारांना द्या. संधी दिली पाहिजे,” असंही रावसाहेब दानवे यांनी नमूद केलं. दरम्यान, विरोधकांनी विधीमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवरून सत्ताधाऱ्यांना घरेलं. तसेच उद्धव ठाकरे यांच्या जागेवर मुख्यमंत्री म्हणून इतर कुणाला बसवावं अशीही मागणी केली. सुधीर मुनगंटीवार यांनी अधिवेशन काळात मुख्यमंत्रिपदाचे अधिकार अजित पवार यांच्याकडे देण्याची मागणी केली, तर रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली. या सर्व वक्तव्यांचा अजित पवार यांनी समाचार घेत बाकीच्यांनी यात नाक खुपसायचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. अजित पवार म्हणाले होते, “मुख्यमंत्री पदाचा पदभार कोणाकडे द्यावा असं जरी कोणी बोलत असतील तर बाकीच्यांनी यामध्ये नाक खुपसायचं कारण नाही. मुख्यमंत्री येणार होते, पण आम्ही नको सांगितलं. मुख्यमंत्री वर्षावरून कामकाज पाहत आहेत. बाकीच्यांनी काळजी करायची गरज नाही.”

  • “मुख्यमंत्र्यांनी करोनाच्या वाढत्या परिस्थितीत बाहेर येणं योग्य नाही”

“मुख्यमंत्री वर्षावरून कॅबिनेट घेत आहेत, टास्क फोर्स सोबत बैठक घेत आहेत, पालकमंत्र्यांना सूचना करत आहेत. मोठं ऑपरेशन झालं आहे. त्यांनी करोनाच्या वाढत्या परिस्थितीत बाहेर येणं योग्य नाही. तब्येतीची काळजी महत्वाची आहे,” असंही पवारांनी सांगितलं.

  • “अधिवेशनाला शेवटपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती राहिली”

अजित पवार म्हणाले, “या अधिवेशनाला शेवटपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती राहिली. सुरुवातीला अधिवेशन सुरू होण्याआधी मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन खालच्या आणि वरच्या सभागृहाची पाहणी केली. त्यांचं अधिवेशनावर फार बारकाईने लक्ष होतं. त्यांनी त्याबाबत सूचना देखील केल्या होत्या. या काळात ज्या दोन कॅबिनेट झाल्या त्यालाही ते व्हीसीद्वारे हजर होते.

  • “…पण कधीकधी सर्वच गोष्टी मनासारख्या होत नाहीत”

“मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाला यावं अशी आमची सर्वांचीच इच्छा होती. मी पण सुरुवातीला चहापानाच्या कार्यक्रमावेळी पत्रकार परिषदेत स्टँपवर लिहून देऊ का असा दावा केला होता. पण कधीकधी सर्वच गोष्टी मनासारख्या होत नाहीत. गावाकडे म्हटलं जातं स्टॅम्पवर लिहू देऊ का? त्यापद्धतीने मी म्हटलो होतो. पण मुख्यमंत्री आले नाहीत,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

  • “…म्हणून मी आणि बाळासाहेबांनी मुख्यमंत्र्यांना अधिवेशनात येऊ नका असं सांगितलं”

“शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री येणार होते, पण करोनाचे रुग्ण वाढायला लागले म्हणून मी आणि बाळासाहेब यांनी त्यांना अधिवेशनात येऊ नका असं सांगितलं. त्यांची तब्येत पूर्ण सुधारावी यासाठी आपण प्रार्थना करूया,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button