मुंबईतील ९७ टक्के रुग्ण कोरोनातून मुक्त; २ टक्के नागरिकांनी गमावला जीव
मुंबई – आतापर्यंत ७ लाख ४३ हजार १५३ मुंबईकरांना कोरोनाची लागण झाली होती. यातील तब्बल ९७ टक्के मुंबईकर कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत, तर २ टक्के नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात काही दीर्घकालीन आजार असलेल्या नागरिकांचाही समावेश आहे. तसेच देशातील अन्य शहरांच्या तुलनेत मुंबईत कोरोना संसर्ग झालेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. यापैकी कोरोनाशी झुंज देत काही नागरिक बरे होऊन घरी परतले. मात्र आपले कर्तव्य बजावत असताना, शासकीय, महापालिका कर्मचारी व अधिकारी, आरोग्य कर्मचारी, बेस्ट, एसटी कर्मचार्यांनी आपला जीव गमावला.
मुंबईत आतापर्यंत १५ हजार ९७२ जणांचा कोरोनाने बळी घेतला. सर्वाधिक मृत्यू ६० वर्षांवरील नागरिकांचा झाला. मुंबईत कोरोनाने बरे होणार्या नागरिकांची टक्केवारी ९७ टक्के असून आतापर्यंत ७ लाख २१ हजार ७५९ कोरोनाबाधित नागरिक बरे झाले. मुंबईत सर्वाधिक ५५ हजार ३३२ रुग्ण सापडलेल्या अंधेरीत ५४ हजार १८८ जण बरे झाले. तर बोरिवलीत ५१ हजार ६८९ कोरोनाबाधित नागरिकांपैकी ५० हजार ४१७ नागरिक बरे होऊन घरी परतले. मुंबईत आतापर्यंत ७ लाख ४३ हजार १५३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असली तरी, या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या तब्बल ८० लाख २६ हजार १४६ नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. या ४२ हजार २३७ नागरिकांना त्यांच्या घरीच क्वारंटाईन करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.