लोकसभा निवडणूक : ‘पटक देंगे’ चा इशारा लोक अजूनही विसरलेले नाहीत!
गांधीनगर : शिवसेना – भाजपची युती तुटल्यानंतरच्या भाजप – शिवसेनेमधल्या चकमकी काही फार जुन्या नाहीत. उद्धव ठाकरेंनी अमित शहांचा अफझलखान या नावाने केलेला उद्धार आणि मग अमित शहांनी त्यांनी दिलेला ‘पटक देंगे’ चा इशारा लोक अजूनही विसरलेले नाहीत.
या वादात जसे सगळे खान आले तसंच कुंभकर्णाच्या नावाने रामायण, महाभारतही झालं. पण आता मात्र मोदींच्या गुजरातमध्येच, गांधीनगरमध्ये उद्धव ठाकरे आणि अमित शहांची दिलजमाई झाली आहे.
आमची हृदयं एक झाली आहेत, असा मृदू सूर लावत उद्धव ठाकरेंनी अमित शहांच्या भव्य सभेमध्ये भाग घेतला. एवढंच नव्हे तर अमित शहांनी गांधीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरला तेव्हाही उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत होते.
‘मला बघून आश्चर्य वाटलं असेल’
विधानसभा आणि लोकसभेमध्ये पाहिलेल्या या दोन चित्रांवर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. उद्धव ठाकरेंच्याही मनात कदाचित हेच चाललं असावं. म्हणूनच अमित शहांच्या सभेमध्ये भाषण करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मला इथे बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण आता आम्ही मनाने एक झालो आहोत.
अमित शहांनीही उद्धव ठाकरेंचं मनापासून स्वागत केलं. मी त्यांना या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो, असं अमित शहा यांनी बोलताना सांगितलं.
अर्थात, निवडणुकीच्या राजकारणात ही दिलजमाई झाली असली तरी अमित शहा यांनी मातोश्रीवर येऊन आपल्याला युतीसाठी गळ घातली हे सांगायला मात्र उद्धव ठाकरे विसरले नाहीत.
या सगळ्या घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांनी लगेच ट्वीट करून भाष्य केलं.