CST Bridge Collapse: या दुर्घटनेला पादचारीच जबाबदार, भाजप नेत्याचं अजब विधान
मुंबई – ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून दुर्घटना झाली. सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३१ जण जखमी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसहित अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला. मात्र, भाजपाच्या एका नेत्याने ही दुर्घटना घडण्यास पादचारी जबाबदार असल्याचं अजब विधान एका वृत्त वाहिनीवर बोलताना केलं आहे.
भाजपा प्रवक्त्या संजू वर्मा यांनी सीएसएमटी पूल दुर्घटनेसाठी थेट पादचाऱ्यांनाच जबाबदार ठरवलं आहे. टाइम्स नाऊशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. संजू वर्मा यांनी ही दुर्घटना नैसर्गिक असल्याचं सांगितलं. सोबतच सरकारचं याच्याशी काही घेणं देणं नसल्याचं सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला आणि पादचारीच दुर्घटनेला जबाबदार असल्याचं म्हटलं. संजू वर्मा यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे.
नरिमन पॉइंट, चर्चगेट आणि आसपासच्या परिसरातील कार्यालयांमधील नोकरदार मंडळी पूर्व उपनगरांत आपल्या घरी जाण्यासाठी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात येत असतात. त्यामुळे या परिसरात नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. त्याचवेळी या परिसरात वाहनांचीही गजबज असते. सायंकाळी दादाभाई नौरोजी मार्ग गर्दीने फुलून जातो. या मार्गावरील बी. टी. लेन येथून टर्मिनसमध्ये जाणारा हिमालय पादचारी पुलाचा साठ टक्क्य़ांहून अधिक भाग गुरुवारी सायंकाळी ७.२० च्या सुमारास अचानक कोसळला आणि एकच गोंधळ उडाला.