6 जानेवारी पासून शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन…
मुंबई |महाईन्यूज |
राज्यातील विद्यार्थ्यांवर सांविधनिक संस्कार होण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनापासून म्हणजेच 26 जानेवारी 2020पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्य सरकारने काढलेल्या एका परिपत्रकानुसार, संविधानाचे सामूहिक वाचन हा उपक्रम ‘सार्वभौमत्व संविधानाचे जनहित सर्वांंचे’ या अभियानाचा भाग आहे.
लहानपणापासूनच मुलांना समता, स्वातंत्र्य, समानता, धर्मनिरपेक्षता आणि बंधुता या पंचसूत्राचे मुलांवर संस्कार करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी लोकशाही आघाडी सरकारच्या काळात फेब्रुवारी 2013 मध्येच सर्व शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सत्तांतरानंतर या निर्णयाची अंमलबजावणी रखडली होती. आता पुन्हा एकदा या निर्णयाची अंमलबजाणी करण्याचे सरकारने ठरवले आहे. त्यानुसार आता शाळांमध्ये प्रार्थना संपल्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचं रोज वाचन करण्यात येणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी महटलं आहे.
सध्या देशात सीएए आणि एनआरसी विरोधात असंतोष पसरला असताना शाळांमध्ये संविधानाचे सामूहिक वाचन करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भातील कायदा येत्या अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याची माहिती मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी दिली.