मालमत्तांच्या नुकसान भरपाईपोटी ४८ लाखांची मदत
नाशिक : जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत अतिवृष्टीने सिन्नरसह जिल्ह्यातील अनेक भागात मालमत्तांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी ४८ लाख ४९ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यास प्राप्त झाला आहे.या वर्षी पावसात शेतीसह मालमत्तांचे मोठे नुकसान होत आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सिन्नर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पावसाने ८० गावातील १० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. शेकडो घरे व दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरले.
१४ बंधारे, तीन पोल्ट्री, दोन पूल आणि १२ विहिरींचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात समोर आले होते. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतानाच ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी अतिवृष्टीग्रस्तांना सांगली, कोल्हापूर आणि कोकणच्या धर्तीवर मदत केली जाईल, असे म्हटले होते. तातडीने पंचनामे होऊन मदतीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला गेला. मालमत्तेच्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत देण्यास मान्यता दिली गेली. यात मृत जनावरे, पूर्णत: नष्ट,अंशत: पडझड झालेली कच्ची, पक्की घरे, झोपडी, गोठे यासारख्या नुकसानीचा अंतर्भाव होता. नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नुकसानग्रस्तांच्या मदतीचा प्रस्ताव शासनाला पाठविले होते.
त्यानुसार नाशिक जिल्ह्याला जून, जुलै या दोन महिन्यातील झालेल्या नुकसानीसाठी २५ लाख ४९ हजार तसेच ऑगस्ट, सप्टेंबरमधील नुकसानीसाठी २३ लाख असा एकूण ४८ लाख ४९ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या मदत निधीत मुख्यत्वे पडझड झालेली घरे, दुकानातील साहित्याच्या नुकसानीचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीचेही पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.