400 वर्षांची परंपरा असणारा पंढरपूरचा चैञीवारी सोहळा रद्द
पंढरपूरमधील महाराज मंडळींचा मोठा निर्णय
पंढरपुर – पंढरपूरमध्ये भरणाऱ्या चार प्रमुख वाऱ्यापैकी असलेली चैत्री वारीच्या येत्या 4 एप्रिलला संपन्न होणार होता. मात्र कोरोनाच्या जीवघेण्या सावटामुळे चैत्रीचा हा सोहळा रद्द करण्यात आला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप देवव्रत महाराज वासकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराज मंडळीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी हभप चैतन्य महाराज देहुकर, हभप निवृत्ती महाराज नमदास, हभप रामकृष्ण महाराज वीर, हभप भाऊसाहेब महाराज गोसावी आदी उपस्थित होते.
पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी…वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र असला तरी देशावरील आलेले कोरोणाचे संकट भयंकर आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनता कर्फ्यु पुकारला आहे. जनतेच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला साथ देण्यासाठी चैत्री वारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. वारीची परंपरा खंडीत होते आहे हे कारण काढून कोणीही पंढरपूरला येण्याचा अट्टाहास करु नये.
चैत्री वारीला तीन ते चार लाख वारकरी भाविकांची उपस्थिती असते. वारी रद्द केल्याने कोरोनाला लगाम बसणार आहे वारीला चारशे वर्षाची परंपरा आहे वारी रद्द होण्याचा पहिलाच प्रसंग आहे. वारीची परंपरा स्थानिक महाराज मंडळी रुढी नुसार पार पाडतील. जे नियमाचे वारकरी आहेत त्यांना आपल्या घरातच व्रतवैकल्य करुन श्री विठ्ठल रखुमाई चे पूजन करावे पंढरपूरला येण्याचा अट्टाहास करुन नये कोरोना मुळे सध्या श्री विठ्ठल मंदिर बंद आहे तेंव्हा वारकऱ्यांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन तमाम वारकरी मंडळींना केले आहे.
वारकरी फडकरी दिंडीकरी संघटनेने चैत्री वारीला वारकऱ्यांनी येवू नये असे आवाहन केलेले आहे वारकऱ्यांनी वारकरी संप्रदायाच्या शिस्तीचे पालन करावे, असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर समिती पंढरपूर सदस्य हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी केले आहे.