4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी; पगारही मिळणार फक्त ५० टक्के, कामगार कायद्यात बदल
नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
नव्या आर्थिक वर्षात नवे कामगार धोरण लागू होणार आहे. मात्र या धोरणामुळे कर्मचाऱ्यांचा पगार वाढण्याएवजी कमी होणार आहे तर पीएफमध्ये मात्र चांगलीच गुंतवणूक होणार आहे. केंद्र सरकार चारही कामगार कायद्यात बदल करण्याच्या तयारीत आहे. यानुसार कामाचे तास वाढणार असून सुट्टीचे दिवसही वाढणार आहेत.
श्रमिक, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक आणि व्यवसाय सुरक्षा आधी स्थितीवर चार नव्या कायद्यांचा मसुदा तयार करण्यात आला आहे. केंद्र सरकारने या मसुद्याला अंतिम स्वरूप दिले असून राज्याला स्वतःचे नियम बनवण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारने फेब्रुवारी २०२१ मध्येच अंतिम मसुद्याला रूप दिले आहे. त्यामुळे फक्त सर्व राज्य सरकार कडून मसुद्याची निर्मिती होणे अपेक्षित असून आता पर्यंत १३ राज्यांनी मसुदा तयार केला आहे.
नवीन कायदा काय सांगतो?
नव्या कायद्यानुसार तुमच्या वेतन आणि पीएफ मध्ये बदल होणार आहे. म्हणजेच तुमच्या हातात केवळ ५० टक्के बेसिक पगार येईल आणि ५० टक्क्यांची वर्गवारी विविध भत्ते आणि पीएफ योगदानात जाणार आहे. भविष्य निधीची गणना मूळ वेतनाच्या टक्केवारीवरुन केली जाते.
या नव्या कामगार कायद्यांत कामाच्या दिवसाबाबतही बदल प्रस्तावित आहेत. यानुसार कार्यकालीन वेळेत तीन तासांची वाढ होणार आहे. दिवसाला 12 तास याप्रमाणे आठवड्याला 48 तासांचा कामाचा नियम लागू असेल. दरम्यान, कामाचे तास वाढविण्याच्या मुद्द्यावर कामगार संघटना आक्रमक झालेल्या आहेत. त्यामुळे कामाच्या तासांवरुन वादंग उठण्याची शक्यता आहे.