राज्यात ४ दिवस पावसाचे! कोकण, पुणे, सांगली, मराठवाड्यात यलो अलर्ट
मुंबई – कधी मुसळधार तर कधी संततधार पडत असलेल्या पावसाचा आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र त्यानंतरही येत्या ४ दिवसांत कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे. त्यामुळे विजा चमकताना घराबाहेर काम करणे टाळा, असे आवाहन हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी केले आहे. दरम्यान, ९ ऑक्टोंबरपासून पाऊस थांबेल आणि शेतकऱ्यांच्या हाती खरीपाची पिके लागतील, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. नेवासा तालुक्यातील दिघी ग्रामपंचायतीच्या वतीने पंजाबराव डख आणि डॉ. अमोल चिंधे यांचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. त्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आता पाऊस परतीच्या मार्गाला लागला आहे. मात्र त्यातही आगामी ४ दिवसांत कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्यामुळे या काळात घराबाहर पडण्याचे टाळा, असे आवाहन कुलाबा वेधशाळेने केले आहे. ५ ऑक्टोंबरला रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना आणि ६ व ७ ऑक्टोंबरला रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पावसाने परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे ९ ऑक्टोंबरपासून पाऊस थांबेल, असे हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी म्हटले आहे. अलीकडच्या काळात वाढलेली वृक्षतोड आणि पृथ्वीचे वाढलेले तापमान यामुळे पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यात अतिवृष्टी, गारपीट होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तेव्हा वृक्षलागवड करून पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. दिघी ग्रामपंचायतीच्या वतीने पंजाबराव डख आणि सलाबतपूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल चिंधे यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.