तुकाराम महाराजांचा ३७४ वा बीज सोहळा; इंद्रायणीचा तट वैष्णवांच्या गर्दीने फुलून गेला
देहूरोड | संत तुकाराम महाराजांचा ३७४ वा बीज सोहळा अर्थात वैकुंठ गमन सोहळ्याची आज भाविकांनी अनुभूती घेतली. पहाटेपासून इंद्रायणीचा तट वैष्णवांच्या गर्दीने फुलून गेला होता. कोणी स्नान करण्यात, कोणी कपाळी अष्टगंध, बुक्का लावण्यात, तर कुणी आपला पोशाख नीट करण्यात गुंतले होते.
प्रत्येकाच्या मनात तुकाराम महाराजांचा बीज सोहळा पाहण्याची एकच आस लागून राहिली होती. त्याप्रमाणे सर्वजण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येत होते. पहाटे तीन वाजता काकडा झाला. श्रींची महापूजा, शिळा मंदिरात पूजा, देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे आदींच्या हस्ते सर्व पूजा झाल्या.चांदीच्या पादुका चकाकी देऊन आणल्या होत्या. फुलांनी सजवलेली पालखी भजनी मंडपात ठेवण्यात आली होती. या ठिकाणी पादुका पालखीत ठेवण्यात आल्या. सकाळी दहा वाजता पालखी मानकऱ्यांनी खांद्यावर घेतली. एकच गलका झाला आणि पालखी वैकुंठस्थान मंदिराच्या दिशेने निघाली.