37 वर्षीय महिलेची पोटच्या मुलासह आत्महत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
मुंबई | प्रतिनिधी
मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाल डोंगर परिसरातील alta vista building येथे एका महिलेने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलासह आत्महत्या केल्याची धक्क्दायक घटना घडली आहे. दोन दिवसापूर्वी महिला आणि चिमुकला बेपत्ता असल्याची तक्रार नेहरूनगर कुर्ला पोलीस ठाण्यांमध्ये देण्यात आली होती. तेव्हापासून पोलिसांनी दोघांचाही शोध सुरु केला होता. पण आता त्या दोघांचाही मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
महिलेचे तिच्या पतीसोबत काही वाद होते त्यामुळे ती गेल्या काही दिवसापासून आपल्या आईच्या घरी कुर्ला कामगार नगर येथे राहत होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी आपल्या पतीच्या घरी आल्यानंतर तिने आपल्या मुलासह बिल्डिंगच्या 18व्या मजल्यावरून आत्महत्या केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेड आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढले. हे दोन्ही मृतदेह शविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात नेण्यात आले आहेत. मृत महिलेचं नाव श्रुती महाडिक असून मुलाचे नाव राजवीर महाडिक आहे. महिलेचं वय 37 वर्ष असून मुलाचे वय साडेतीन वर्ष आहे.
दरम्यान, आता याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा आता कुर्ला पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ही आत्महत्या आहे की घातपाताचा प्रकार हे देखील आता पोलीस तपासणार आहेत. मात्र, प्राथमिकदृष्ट्या घरगुती वादातून महिलेने आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण, तरीही पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास करत आहेत.
चार लेकरांसह आईची विहीरीत उडी मारत आत्महत्या
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चार लेकरांसह आईची विहीरीत उडी मारत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना जालन्यात घडली होती. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे एका विवाहितीने आपल्या चार मुलांसह विहीरीत उडी मारत आत्महत्या केली होती. या घटनेत आई गंगासारग अडाणी यांच्यासह त्यांची मुलं भक्ती (वय 13), ईश्वरी (वय 11), अक्षरा (वय 9) आणि मुलगा युवराज (वय 7) यांचा मृत्यू झाला होता.
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव गावातील ज्ञानेश्वर प्रल्हाद अडाणी हे पत्नी गंगासागर अडाणी व तीन मुली आणि एक मुलासह गावात राहतात. ३० डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १ वाजल्याच्या दरम्यान गंगासागर ह्या तीन मुली व मुलासह शेतात चक्कर मारायला गेल्याचं गावकऱ्यांनी पाहिलं होतं. गंगासागर यांनी मुला-मुलींसह सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शेतातच वेळ घालवला. सात वाजेपर्यंत ही पत्नी मुलांसह परत आली नाही म्हणून ज्ञानेश्वर अडाणी व गावातील नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत त्यांची शोधाशोध केली. परिसरातील सर्व विहिरी व जायकवाडी डावा कालवा परिसर पिंजून काढला मात्र त्या आढळून आल्या नाही.
यानंतर घरच्यांनी व गावातील काही लोकांनी त्यांचा शोध सुरूच केला. आजूबाजूच्या शेतात व विहिरींमध्ये ही शोधमोहीम सुरु होती. त्यानंतर रात्रभर शोध घेऊनही गंगासागर व मुलांचा पत्ता लागला नाही. यानंतर सकाळी काहींच्या नजरेत अडाणी यांच्या शेताच्या शेजारील गणेश फिसके यांच्या गट क्रमांक ९३ मधील विहिरीत पाचही जणांचे मूतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. गंगासागर अडाणी हिने आपल्या चार मुलांसह विहिरीत उडया मारून आत्महत्या केली असल्याचे आढळून आले.