महाराष्ट्रातील ६५ पैकी ३५ रुग्णांची ओमायक्रॉनवर मात! आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
मुंबई | प्रतिनिधी
ओमायक्रॉनचे महाराष्ट्रात एकूण ६५ रुग्ण आहेत. त्यापैकी ३५ जणांनी त्याच्यावर यशस्वीपणे मात केली आहे. सध्या राज्यात ओमायक्रॉनचे ३० आणि कोरोनाचे ७,३५० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. त्यातही सर्वाधिक म्हणजे ३० रुग्ण एकट्या मुंबई शहरात आहेत. मात्र दिलासादायक बाब म्हणजे यातील ३५ रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात आजवर एकंदर ६ कोटी ८० लाख ६ हजार ३२२ कोरोना चाचण्या केल्या. त्यात ६६ लाख ५२ हजार १६६ जण पॉझिटिव्ह आढळले. राज्यातील ६६ लाख ५२ हजार १६६ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ९९ हजार ७६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १ लाख ४१ हजार ३७५ जणांचा राज्यात कोरोनाने बळी घेतला आहे.
राज्यात काल दिवसभरात १ हजार २०१ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. तर ८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आणि एका दिवसात ९५३ जणांनी कोरोनावर मात केली. राज्यात कोरोनाचा मृत्यूदर २.१२ टक्के आणि पॉझिटिव्हिटी रेट ९.७८ टक्के आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९७.७१ टक्के आहे. राज्यात ७५ हजार २७३ जण होमक्वारंटाईन आणि ८६० जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. ओमायक्रॉनच्या ६५ रुग्णांपैकी ३० पेक्षा जास्त रुग्ण मुंबईत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये १२, पुणे ग्रामीण ७, पुणे शहर ३, सातारा ३, कल्याण-डोंबिवली २, उस्मानाबाद ३, बुलढाणा १, नागपूर १, लातूर १, वसई-विरार १ आणि नवी मुंबईत १ असे राज्यात ओमायक्रॉनचे एकूण ६५ रुग्ण आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी प्रत्येकी २ रुग्ण कर्नाटक आणि केरळचे आहेत. तर छत्तीसगड, गुजरात, जळगाव, ठाणे आणि औरंगाबाद येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. ओमायक्रॉनच्या बऱ्या झालेल्या ३५ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.