देशात आठवडाभरात ३२ टक्के रुग्णवाढ; ३८० जणांचा कोरोनाने मृत्यू
मुंबई – देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना सतत तिसऱ्या लाटेचे संकेत वर्तवण्यात येत होते. आता कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. एका आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये १.९ लाख रुग्ण म्हणजेच ६५ टक्क्यांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद केरळमध्ये झाली. आता भारतात गेल्या २४ तासांत तब्बल ४२ हजार ९०९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रत्येकाने खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. देशात रविवारी ३८० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
गेल्या २४ तासांत ३४ हजार ७६३ जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९७.५१ टक्क्यांवर आहे. आतापर्यंत कोरोनातून ३ कोटी १९ लाख २३ हजार ४०५ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत देशात ३२ लाख १४ हजार ६९६ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तसेच एकूण लसीकरण ६३.४३ टक्के झाले आहे. फक्त देशातच नाही तर महाराष्ट्रातदेखील नव्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी महाराष्ट्रात ४ हजार ६६६ जणांना कोरोनाची लागण झाली. तर एकून १३१ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले. तसेच ३ हजार ५१० रुग्ण कोरोनातून बरे झाले. महत्त्वाचे म्हणजे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर सध्या ९७ टक्क्यांवर आहे.