पंढरपूरला विठूरायाच्या दर्शनासाठी गेलेल्या मुंबईतील ३० भाविकांना विषबाधा
सोलापूर । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेलेल्या मुंबईतील ३० भाविकांना जेवणातून विषबाधा झाली आहे. उपाचारासाठी बाधितांना पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. विठूरायाच्या दर्शनासाठी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बीड, जालनासह राज्यातील अन्य भागातून भाविक येतात. चंद्रभागा नदीत स्नान करुन भाविक विठूरायाचे दर्शन घेतात. मुंबईतील काही भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी गेले होते. विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी चंद्रभागा नदीकाठी असलेल्या हाॅटेलमध्ये जेवण केले.
जेवणानंतर या भाविकांना उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यांना उपचारासाठी तात्काळ पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काहीजण गंभीर असल्याचे सांगण्यात आले. नेमकं काय घडलं याचा पोलीस तपास करत आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे पथक येथे दाखल झाले आहे. या घटनेनंतर नगरपालिका व जिल्हा आरोग्य विभागाचे पथक सर्तक झाले आहे. मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.
विठूरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाने सोय केली आहे. आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला भाविकांचा सागर येथे लोटतो. गर्दीचे नियोजन करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून विशेष आखणी केली जाते. फिरते शौचालय व अन्य व्यवस्था केली जाते. साथीचे आजार पसरु नये यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून नियोजन केले जाते. भाविकांना मिळणारे अन्न आरोग्यदायी आहे की नाही याचाही काळजी घेतली जाते. त्यामुळेच विषबाधेसारखे प्रकार क्वचित घडतात.
मंगळवारी घडलेल्या विषबाधेच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. विषबाधा झालेले भाविक ज्या हाॅटेलमध्ये जेवले तेथे पोलीस चौकशी करतील. तेथील कामगारांचे जबाब नोंदवले जातील. अन्न व औषध प्रशासनाकडून त्या हाॅटेलमधील अन्नाचे नमूने तपासले जातील. या नमून्यांमध्ये दोष आढळल्यास हाॅटेलवर कारवाई केली जाईल. पोलीस तपासात दोष आढळल्यास फौजदारी कारवाई केली जाईल. या घटनेमुळे जागे झालेले प्रशासन अन्य भाविकांना अशाप्रकारे विषबाधेसारखा त्रास होणार नाही याची काळजी घेत आहे.