राज्यात ओमायक्रोनच्या २३ नव्या बाधितांची नोंद, समूह संसर्ग नसल्याचा दावा
मुंबई | प्रतिनिधी
राज्यात आज सर्वाधिक ओमायक्रोनच्या रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल २३ नवे रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. आज सापडलेल्या रुग्णांपैकी १३ रुग्ण पुम्यातील तर ५ रुग्ण मुंबई, २ उस्मानाबादचे आणि ठाणे-मीरा-भायंदर, नागपूर येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या कोरोना विषाणूचा समूह संसर्ग अजून तरी झालेला नसल्याचे उघड झाले आहे. जिनोमिक सिक्वेंसिंगच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. राज्यातील सर्व वयोगटातील करोना बाधितांचे घेतलेले नमुने दिल्लीला पाठवण्यात आले होते. आता त्याचा अहवाल समोर आला आहे. जिनोमिक सिक्वेंसिंगच्या अहवालात म्हटले आहे की, राज्यात अजून तरी ओमिक्रॉनचा समूह संसर्ग झालेला नाही. आजपर्यंत केलेल्या सर्वेक्षणावरून राज्यात डेल्टाचाच समूह संसर्ग असल्याचे पुढे आले आहे. पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजकडे देण्यात राज्य समन्वयाची जबाबदारी आहे. त्यानुसार राज्यातील सर्व वयोगटातील कोरोनाबाधितांच्या घेतलेले नमुने दिल्लीला पाठवण्यात आले होते. त्यातूनच ही माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक अँण्ड इंटीग्रेटीव्ह बायोलॉजी या संस्थेसोबत जीनोम सिक्वेंसिगंच्या अहवाल देण्याबाबत करार केला आहे. आता या इन्स्टिट्यूटने दिलेल्या अहवालात राज्यात ओमिक्रॉनचा समूह संसर्ग सुरू झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यामुळे महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे.