औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. याचे कारण औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे. शिवसेनेला हा प्रस्ताव मंजूर असून महाआघाडीतील प्रमुख घटक कॉंग्रेसने या नामांतरणाला विरोध केला आहे.
कॉंग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी या नामांतरणाला विरोध केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “संभाजीनगर नाव करण्याला आमचा विरोध असेल. महाविकास आघाडी विकासाच्या मुद्द्यावर स्थापन करण्यात आली आहे. सरकारनं सामान्य माणसाचं जीवन सुखी कसं होईल हे पाहायचं, हा कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या मुख्य हेतू आहे. महाविकास आघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये अशाप्रकारे शहरांचं नाव बदलण्याचं ठरलेलं नाही.”
वाचाः 30 जानेवारीला एल्गार परिषद : बी. जी. कोळसे पाटील
“नाव बदलण्याचा हा अजेंडा आम्हाला मान्य नाही. नाव बदलावर काँग्रेसचा विश्वास नाही. शहराच्या नावात बदल करुन काही होत नाही, काही गोष्टींचा इतिहास बदलू शकत नाही, असे थोरात म्हणाले. बाळासाहेबांनी सांगितले की, आम्ही विकासाची वाटचाल सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून करत आहोत, हे आमचे सूत्र आहे आणि हे राज्य घटनेच्या मूलभूत तत्त्वांना धरुन आहे. शहराच्या नावात बदल करणे ही गोष्ट आम्हाला मान्यच नाही. या प्रस्तावाला निश्चितच आमचा विरोध राहणार.”