मुंबई | प्रतिनिधी
भाजपच्या नेत्यांच्या किंवा धोरणांच्या विरोधात जो कोणी बोलेल त्यांच्या मागे ईडी, सीबीआयची चौकशी लावायची. सीबीआयबाबत तर आम्ही निर्णय घेतला आहे. आमच्या परवानगी व्यतिरिक्त राज्यात सीबीआय चौकशी होऊ शकत नाही. मात्र ईडीचा जो अधिकार आहे त्यांचा अधिकार व त्याचा राजकारणासाठी वापर करणे हे महाराष्ट्रात कधीही पाहिलं गेलं नाही, अशी टीका गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर केली आहे.
पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप नेते पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ईडी प्रकरणावर भाष्य केलं आहे.
दरम्यान, केंद्र सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांना ईडीकडून नोटीस देण्यात येते, हे आता जनतेला समजले आहे. जाणीवपूर्वक त्रास देण्याचे हे धोरण आहे. मला खात्री आहे की, त्यामध्ये काही निष्पन्न होणार नाही. केंद्र सरकारविरुद्ध बोलणार्यांना बदनाम करण्याचा काही लोकांचा प्रयत्न असल्याचे दिसून येते, असा सणसणीत टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ईडीचा वापर केला जातोय. भाजपचे काही मध्यस्थ आहेत जे मला वारंवार भेटले आहेत. मागच्या वर्षभरात त्यांनी मला हे सरकार पाडण्यासंदर्भात धमकावले आहे. हे सरकार आम्हाला पाडायचं आहे. आमची यंत्रणा सज्ज आहे, तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका असं सांगितलं जातंय, असा आरोप राऊतांनी केला आहे.