उत्तराखंडच्या गिर्यारोहण मोहिमेवर गेलेल्या १२ जणांचा मृत्यू, तीनजण बेपत्ता
डेहराडून – प्रतिकूल हवामानामुळे उत्तराखंडच्या गिर्यारोहण मोहिमेवर गेलेल्या २१ जणांच्या दोन पथकातील १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भारताच्या वायुदलाने लमखागा पास येथे १७ हजार फुटांच्या उंचीवर शोधकार्य सुरू केले आहे. या परिसरात १८ ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी झाली. हिमवृष्टीमुळे पर्यटक, पोर्टर (हमाल), गिर्यारोहक अशा १७ जणांशी असलेला संपर्क तुटला. या सर्वांना शोधण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेत आतापर्यंत १२ मृतदेह सापडले. तर तीनजण अद्याप बेपत्ता आहेत.
लामखागा पास हा खिंडीचा भाग उत्तराखंडच्या हरसिल जिल्ह्याला हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्याशी जोडतो. हिमवृष्टी झाल्यामुळे लामखागा पास परिसरात गेलेल्या १७ जणांशी संपर्क होत नसल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने वायुदलाला दिली. तसेच प्रशासनाने वायुदलाकडे शोध कार्यासाठी मदत मागितली. वायुदलाने प्रशासनाकडून विनंती येताच २० ऑक्टोबरपासून शोधकार्य सुरू केले. शोधकार्य सुरू झाल्यापासून आतापर्यंत १२ जणांचे मृतेदह सापडले आहेत.
वायुदलाचे दोन हलक्या वजनाचे हेलिकॉप्टर आणि एनडीआरएफचे तीन सदस्य संयुक्तपणे शोधकार्य करत आहेत. शोधकार्याची सुरुवात लमखागा पास परिसरात १९ हजार ५०० फुटांच्या उंचीवर झाली. या शोधमोहिमेत एसडीआरएफचे पथक २१ ऑक्टोबर रोजी सहभागी झाले. वेगवेगळ्या उंचीवर एकाचवेळी शोधकार्य सुरू करण्याचा निर्णय झाला. डोगरा स्काउट्स, ४ आसाम रायफल्स आणि दोन आयटीबीपी पथके यांनीही शोधकार्य सुरू केले. आतापर्यंत १२ मृतदेह आणि दोन जिवंत व्यक्ती अशा १४ जणांना बेस कॅम्पवर आणण्यात आले. तिथून मृतदेह शवागारात तर जिवंत व्यक्तींना रुग्णालयात नेण्यात आले. उर्वरित व्यक्तींसाठी शोधकार्य सुरू आहे. १२ जणांपैकी ५ मृतदेह बागेश्वर जिल्ह्यात, तर २ मृतदेह लामखागा खिंडीजवळ सापडले.