10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर! अतिवृष्टी – पुरामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा
मुंबई – अतिवृष्टी, चक्रीवादळ यामुळे यंदा राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलं आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली.
राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय आज आपण घेतला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं.
राज्य सरकारच्या मदतीचं स्वरुप नेमकं कसं असेल?
जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर
बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर
बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर
ही मदत 2 हेक्टर मर्यादेत करण्यात येईल
शेतकरी मदतीवरुन विरोधकांचा ठाकरे सरकारवर वार
यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालंय. पण जवळपास दोन महिने झाले तरी राज्य सरकारकडून मदतीची घोषणा होत नाही, असं म्हणत विरोधकांकडून वारंवार टीका केली जात होती. विशेष म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला इशाराच दिला होता. शेतकऱ्यंचा दसरा अंधारात गेला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असं राजू शेट्टी थेट राज्य सरकारला उद्देशून म्हणाले होते. याशिवाय भाजपच्या अनेक नेत्यांनी राज्य सरकारला शेतकरी मदतीवरुन घेरलं होतं. दुसरीकडे राज्य सरकारकडून पंचनाम्याचं कारण दिलं जात होतं.