10 हजारांच्या कर्जासाठी दीड लाखांपेक्षा जास्त अर्ज, पंतप्रधान स्वनिधी योजनेला प्रचंड प्रतिसाद
मुंबई : केद्र सरकारने लॉकडाऊनदरम्यान आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत पंतप्रधान स्वनिधी योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून रस्त्याच्या बाजूला ठेला लावणारे, फळ-भाजीपाला विक्रेते, लॉण्ड्री, पान दुकान चालक अशा छोट्या व्यवसायिकांना 10 हजार रुपयांचं कर्ज दिलं जात आहे. या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत जवळपास दीड लाखापेक्षा जास्त नागरिकांनी या कर्जासाठी अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडून देण्यात आली आहे .
केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या मते, आतापर्यंत दीड लाखांच्या अर्जांपैकी 48 हजार अर्जदारांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. या योजनेचा फायदा जवळपास 50 लाख छोट्या व्यवसायिकांना होईल, असा सरकारचा अंदाज आहे. विशेष म्हणजे शहर आणि ग्रामीण भागातील सर्व छोट्या व्यवसायिकांना या योजनेचा फायदा होणार आहे.
सुक्ष्म, लघु, आणि मध्यम क्षेत्रातील व्यवसायिक, फेरीवाले तसेच रोजंदारीने काम करणाऱ्या नागरिकांसाठी ही महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून व्यवसायिकांना 10 हजार रुपयांचे कर्ज दिलं जात आहे. कर्जदार या कर्जाची परतफेड वर्षभर मासिक हप्त्याने करु शकणार आहेत. याशिवाय जे कर्जदार वेळेवर कर्जाची परतफेड करतील त्यांना वार्षिक व्याजदरात 7 टक्के अनुदान दिलं जाणार आहे.
केंद्र सरकारकडून कर्जदाराच्या बँक खात्यात पैसे ट्रानस्फर केले जातील. मात्र, या योजनेत कोणत्याही प्रकारच्या दंडाची तरतूद नाही. याशिवाय या कर्जासाठी जास्त अटीशर्तीदेखील नाहीत.