मकरंद अनासपुरेचा ‘पाणी बाणी’ चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित
मकरंद अनासपुरेचा आगामी चित्रपट ‘पाणी बाणी’ ८ जून २०१८ पासून महाराष्ट्रातल्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाची कथा ही गावात ठाण मांडून बसलेल्या जीवघेण्या दुष्काळाची आहे. आजवर मराठी चित्रपटामधून बरेच नवनवीन विषय हाताळले गेले आहेत असाच एका डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या संकल्पनेवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सदानंद दळवी आणि प्रज्योत कडू असून निर्माते अतुल दिवे आहेत.
या चित्रपटा विषयी अधिक माहिती देताना अतुल दिवे सांगतात, “ सामाजिक बांधिलकी आणि ज्वलंत समस्येला केंद्रस्थानी ठेवून पाणी बाणीची निर्मिती करण्यात आलेली आहे. आज शहरात आणि खेडोपाड्यात पाणीटंचाई भीषण आहे. पाणीस्त्रोताचे संवर्धन आणि नवीन स्त्रोताची निर्मिती करणे ही काळाची गरज आहे. पाण्याचे थेंब न थेंब साठवले पाहिजे तेव्हाच सगळीकडे आनंदी आनंद पसरू शकले. यावरच आधारित पाणी बाणी हा चित्रपट आहे.”
या चित्रपटाच्या दाखवण्यात आले आहे की, गावात अनेक वर्ष पाऊस आलेला नाही. दुष्काळाला कंटाळून येथील तरुण गाव सोडून चालले आहेत. त्याच वेळी बाहेरून आलेला एक तरुण गावातील लोकांना आश्वासन देतो की, मी तुमच्या सर्वांच्या मदतीने दुष्काळावर मात करेन. मात्र गावातील जमीनदार या तरुणाचा डाव उलथून टाकण्याचा सतत प्रयत्न करतात. परंतु गावकऱ्यांच्या साथीने तरुण गावाला दुष्काळ मुक्त करतो. यात त्या तरुणाची भूमिका मकरंद अनासपुरेने साकारली असून या चित्रपटाचा हा नायक श्रमदानातून गावात जलयुक्त शिवार निर्मितीसाठी झटत आहे. नायकाचा डाव उलथून टाकणाऱ्या जमीनदाराची भूमिका रविंद्र मंकणी साकारात आहेत.