‘२ लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचा सरकारकडून वेगळा विचार’
पुणे |महाईन्यूज|प्रतिनिधी|
‘दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून वेगळा विचार सुरु आहे. सरकार या शेतकऱ्यांना सुध्दा मदत करणार असल्याचे राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
राज्य सरकारने दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. मात्र दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा विचार केला गेला नाही, असे म्हणत शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. यावर जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे.
दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा आम्ही विचार करत आहोत. त्यांना सुध्दा सरकार मदत करणार आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीचे नेते विचार करत आहोत, असे पाटील यांनी सांगितले. तसंच ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची फेड केली आहे अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही एक योजना आणणार आहोत, असे देखील त्यांनी सांगितले.
जयंत पाटील यांनी पुढे म्हणाले की, दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या, त्यांनी घतलेले कर्ज आणि त्यावरील व्याजाची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. तसंच, कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन टीका करणाऱ्यांना जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जर तर आणि शंभर अटी घालून ५० वेळा हेलपाटे घालून त्यांनी कर्ज दिले. आम्ही कोणत्याही शेतकऱ्यांना हेलपाटे न घालता कर्ज माफ करण्याची व्यवस्था करत आहोत, असे जयंत पाटील यांनी सांगितले.