१२ वर्षे रखडलेला कळवा रेल्वे ब्रीज अखेर मार्चमध्ये सुरू होणार
ठाणे – मध्य रेल्वेचे वेळापत्रक रोज कळवा रेल्वे फाटकामुळे कोलमडून पडते. या फाटकाच्या जागी उभा राहणारा कळवा रेल्वे ब्रीज गेली १२ वर्षे रखडल्यामुळे रेल्वेसेवरही त्याचा प्रचंड परिणाम होत होता. आता हा कळवा रेल्वे ब्रीज मार्च महिन्यात बांधून पूर्ण होणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे. त्यामुळे ज्या रेल्वे फाटकामुळे रेल्वेचे टाईम टेबल बिघडते ते कळवा फाटकही मार्च महिन्यात कायमचे बंद होणार आहे.
कळवा रेल्वे फाटकामुळे कोलमडून पडत असलेले रेल्वेचे टाईम टेबल पाहून २००६ साली या ठिकाणी एक पूल बांधण्याचे ठरले. त्यानंतर २००८ साली ठाणे महानगरपालिकेने हा पूल मंजूर करून या पुलाच्या बांधकामाला सुरुवात केली. मात्र हा रेल्वे पूल पूर्व आणि पश्चिमेला ज्या ठिकाणी उतरतो त्या ठिकाणचे रस्ते जमिनीच्या वादामुळे अडकून पडले होते. त्यातील मफतलाल कंपनीच्या जमिनीच्या वादामुळे सर्वात जास्त विलंब झाला. वास्तविक लॉकडाऊन झाल्यापासून महत्त्वाची बांधकामे पूर्ण करण्याची मोठी संधी ठाणे महानगरपालिकेकडे होती. मात्र कर्मचारी मिळत नाहीत, या कारणास्तव या पुलाचे बांधकाम रखडले. मात्र आता पुलाचे आणि पुलाच्या पूर्व पश्चिमेकडील जोड रस्त्यांचे काम पूर्ण गतीने सुरू आहे. येत्या मार्च महिन्यात हा पूल पूर्ण होईल, असे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे. त्यामुळे बारा वर्ष भोगलेला त्रास आणखी चार महिने भोगावा लागणार आहे.