‘हे’ तर मृत बालकांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखेच; सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल
भंडाऱ्यातील शासकीय रुग्णालयात दुर्घटनेत 10 नवजात बालकांचा झालेल्या मृत्यूमुळे महाराष्ट्रसह संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहेत. या घटनेनंतर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपावरून सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.
या दुर्घटनेनंतर भाजपकडून राजकीय भांडवल लगेच सुरू झाले असून, हा बेशरमपणाचा कळस असल्याची टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
काय म्हटले आहेत सामनाच्या अग्रलेखात
दहा बालकांच्या मृत्यूचे खापर ‘यांच्यावर किंवा त्यांच्यावर’ फोडत बसण्यापेक्षा या दुर्घटनेचे आत्मचिंतन करून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेस नवसंजीवनी देता येईल काय, याचा विचार व्हायला हवा. चिमुकल्यांची होरपळ आणि कुपोषणाची पानगळ महाराष्ट्राला लागलेला डाग आहे. केंद्र सरकारने या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. दुःख व्यक्त करून काय होणार? थोडे राजकारण कमी करा आणि पंडित नेहरूंच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जसे काम झाले तसे करा, असा खोचक सल्ला सामना अग्रलेखातून केंद्र सरकारला देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील आरोग्य सेवा देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत बरी असेल, पण बरी म्हणजे कामचलाऊ असणे व सर्वोत्तम असणे यात फरक आहे. म्हणूनच भंडाऱ्यात दहा बालकांचे मृत्यू हा धक्कादायक प्रकार आहे. भारतीय जनता पक्षाने या दुर्घटनेचे राजकीय भांडवल लगेच सुरू केले. हा बेशरमपणाचा कळस आहे. दहा बालकांचे मृत्यू ही सरकारची जबाबदारी नक्कीच आहे, पण मागची पाच वर्षे सत्तेवर असलेल्यांनाही आपली कातडी वाचविता येणार नाही. विदर्भाच्या विकासात भंडाऱ्यातील सामान्य रुग्णालयाचा विकास येत नाही काय?, असे म्हणत अग्रलेखातून फडणवीस सरकारकडे बोट दाखवण्यात आले आहे.
या दुर्घटनेचे राजकारण करणे हे त्या मृत बालकांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखेच आहे. भंडाऱयातील जिल्हा रुग्णालयात झालेल्या दहा बालकांच्या मृत्यूचे खापर ‘यांच्यावर किंवा त्यांच्यावर’ फोडत बसण्यापेक्षा या दुर्घटनेचे आत्मचिंतन करून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेस नवसंजीवनी देता येईल काय, याचा विचार व्हायला हवा.