हिंदुंचा संयम सुटण्याची मला भिती वाटते – गिरीराज सिंह
सर्वोच्च न्यायालयात आजपासून राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद खटल्याची सुनावणी सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आता हिंदुंचा संयम सुटत चालला आहे. हिंदुंचा संयम सुटला तर काय होईल याची मला भिती वाटते असे गिरीराज सिंह म्हणाले. मोदी सरकारमध्ये ते केंद्रीय राज्यमंत्री आहेत. यापूर्वी सुद्धा त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यावरुन वाद निर्माण झाले आहेत.
रविवारी काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे पिंडीवरच्या विंचवासारखे आहेत. त्यांना तुम्ही हाताने काढू शकत नाही आणि चपलेने मारू शकत नाही, असे वक्तव्य केले. यावर भाजपाचे नेते गिरीराज सिंह यांनी थरूर यांना प्रत्युत्तर देत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच नाही तर भगवान शंकराचाही अपमान केला.
हा पाकिस्तान असता आणि थरुर असे काही बोलले असते तर त्यांचे तोंड गप्प केले गेले असते. त्यांनी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच नाही तर हिंदूंचा आणि त्यांचा धार्मिक भावनांचाही अपमान केला आहे. पंतप्रधानांवर टीका करताना काँग्रेसने आता खालच्या पातळीचीही सीमा गाठली आहे असेही वक्तव्य सिंह यांनी केले.