स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद २ नोव्हेंबरला होणार : राजू शेट्टी
जयसिंगपूर | प्रतिनिधी
चालू वर्षीची १९ वी उस परिषद २ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रिडांगणावर होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेटटी यांनी दिली.
गळीत हंगामाचा बिगुल वाजू लागला आहे. या पार्श्वभुमीवर चालू वर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने घेण्यात येणा-या ऊस परिषदेच्या नियोजनाबाबत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची शिरोळ येथील मा. खा.राजू शेटटी यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली.
यावेळी बोलताना राजू शेटटी म्हणाले कि साखर कारखांनदारांनी शेतकर्यांना आव्हान देत शेतकर्यांकडून दबाव टाकून सह्या घेतल्या असल्याने शेतकर्यांना आता रस्त्यावरची व कायदेशीर अशी दोन्ही लढाई लढायला लागणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी संघटनेच्यावतीने ऊस उत्पादक शेतकर्यांना एक रक्कमी एफ आर पी मिळण्यासाठी साखर आयुक्तांकडे अर्ज पाठवण्याचे आवाहन केले. सध्या सरकारने सिनेमाग्रह , हाॅटेल , रेस्टाॅंरंट यांना सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यानीच १ नोव्हेंबर नंतर राज्यातील लाॅकडाऊन शिथील करणार असल्याचे सुतोवाच केले आहे. याच पार्श्वभुमीवर आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून गेली १८ वर्षे उस हंगाम सुरू होण्यापूर्वी जयसिंगपूरच्या उस परिषदेत ऊसदर ठरत असल्याने सरकारने ऊस परिषदेला परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.
राज्यातील सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागावे व १९ वी उस परिषद यशस्वी करण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, स्वाभिनानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, महेश खराडे, वैभव कांबळे, आण्णासो चौगुले , आदिनाथ हेमगीरे , मिलींद साखरपे,अजित पोवार , यांचेसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.