स्वच्छ भारत मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती संस्कारण फाऊंडेशन, श्री ऋष्षीश्वर महाराज युवक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंती पर्व आणि भारतीय सेन्यदल विजय दिनानिमित्त (दि. 16) शब्दांच्या वैचारिक झाडुतून समाजाला स्वच्छतेचा संदेश देणारे पहिले स्वच्छ भारत मराठी साहित्य संमेलन परभणी जिल्ह्यातील मगर सांगवी याठिकाणी ऋष्षीश्वर महाराज सांस्कृतिक सभागृहात रविवारी (दि. 16) भरविण्यात येणार आहे.
या साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते आज सोमवारी (दि. 10) करण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड येथील राष्ट्रभक्ती संस्कारण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन चिलवंत, पिंपरी-चिंचवड भाजप सहकार आघाडीचे शहरसंघटक शिवकुमार बायस उपस्थित होते.
या संमेलनाला जिल्हा परभणी, मानवत येथील के. के. एम. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे 500 विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. हे राज्यातील पहिलेच संमेलन असून यातून स्वच्छ भारत अभियानच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश जगाला दिला जाणार आहे. त्याची सुरूवात प्रत्येकाने स्वतःपासून कशी करायची, यासाठी शपथ दिली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाचा या संमेलनातील सहभाग महत्वाचा ठरणार आहे.