breaking-newsपुणे

सोशल मिडियावर सदसदविवेकबुध्दी जागृत ठेवा – डॉ. सीमा निकम

पिंपरी- सोशल मीडिया हे खूप सामर्थ्यशाली तंत्रज्ञान असले तरी ते माणसासाठी आहे, माणूस त्या तंत्रज्ञानासाठी नाही म्हणून सोशल मीडिया वापरताना आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवा! असे मत समुपदेशक आणि युवा व्याख्यात्या डॉ. सीमा निकम यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

जयभवानी तरुण मंडळ आणि कालीमाता मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय फुले-शाहू-आंबेडकर-लोकमान्य व्याख्यानमालेत ‘सोशल मीडिया – एक दुधारी शस्त्र !’ या विषयावरील तृतीय पुष्प गुंफताना डॉ. सीमा निकम बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सुधाकर पावशे होते; तसेच काशिनाथ नखाते, वसंत काळे, प्रदीप गांधलीकर आदी उपस्थित होते.

डॉ. सीमा निकम म्हणाल्या की, “माणूस हा समाजप्रिय असतो. भाषा अस्तित्वात नसतानाही माणूस संवाद साधायला उत्सुक होता. कबुतरे, दूत, पत्रलेखन, टेलिग्रॅम, टेलिफोन, पेजर, मोबाइल आणि सोशल नेटवर्क अशा विविध साधनांनी माणसाची संवादशैली उत्क्रांत होत गेली. आताच्या काळात तर मोबाइल हे एक जीवनाश्यक साधन झाले आहे. गुगलवरून माहितीचा प्रचंड स्त्रोत उपलब्ध झालेला आहे. डीजिटल मार्केटिंग हे नवीन व्यवसायतंत्र सोशल मीडियामुळे अतिशय लोकप्रिय झालेले आहे. इ.स.2014मध्ये मोदी सरकार सत्तेत येण्यामध्ये सोशल मीडियाचा खूप मोठा वाटा होता. अशा अनेक गोष्टींमुळे सोशल मीडियाने व्यक्तिगत ते समूहांपर्यंत लोकप्रियता संपादन केली आहे.

परंतु ज्याप्रमाणे पैसा हा चांगला किंवा वाईट हा वादविषय आहे, त्याचप्रमाणे सोशल मीडियाचा वापर योग्य की हानिकारक असे विश्लेषण करण्याची वेळ आली आहे. नुकताच गुगलने एका सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर केला. त्यात भारतीय हे ‘गुड मॉर्निंग’ ‘गुड नाईट’ यासह अनेक शुभेच्छा संदेश पाठवण्यात जगात सर्वात आघाडीवर आहेत असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे इंटरनेटचा वेग मंदावतो म्हणून गुगलला ही दखल घेणे भाग पडले आहे. मोबाइल सुरू केल्यावर शुभेच्छा संदेशांचा इतका भडिमार असतो, की ते सर्व संदेश वाचणे केवळ दुरापास्त आहे. याशिवाय अशा संदेशांमध्ये भावनेच्या ओलाव्यापेक्षा औपचारिकताच जास्त असते. सोशल मीडियामुळे अनावश्यक संदेशांची गर्दी वाढली असून महत्त्वाचा संवाद किंवा समोरासमोर संवाद हरवत चालला आहे.  संस्कृत सुभाषिते, सुविचार, शेरोशायरी, दृष्टांत, मार्मिक उदाहरणे, विनोदी किस्से सांगत आपल्या अतिशय ओघवत्या, अभ्यासपूर्ण वक्तव्याने डॉ.सीमा निकम यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. गोरख देवकाते, संतोष राठोड, दिगंबर बालुरे, अभिजित भापकर, शैलेश कोळी, सोन्या जाधव, नवनाथ सलगर, राहुल थोरात यांनी संयोजन केले. मारुती भापकर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button