सोलापुरात महिला कामगारांनी केली वीज बिलांची होळी
सोलापूर – लॉकडाऊनच्या काळात कामगारांना भरमसाठ प्रमाणात वीज बिल आकारण्यात आले आहे. हे वीज बिल तत्काळ रद्द करून सरसकट वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी सोलापुरातील महिला कामगारांनी 25 हजार वीजबिलांची होळी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. ‘वीजबिल माफ झालेच पाहिजे’, अशा जोरदार घोषणबाजी देत महिला कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला.
ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली कामगार महिलांनी वीजबिलाची होळी केली. वीजबिल माफी सोबतच कामगारांना प्रतिमाहिना 10 हजार रुपये अनुदान द्यावे, मनरेगाची कामे शहरी भागात देखील सुरू करण्यात यावीत, कामगार कायद्यातील बदल रद्द करावेत यासारख्या विविध मागण्या यावेळी आंदोलक कामगारांनी केल्या. तसेच सरकार उद्योजकांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देतात, तर दुसरीकडे मात्र कष्टकरी कामगार मजुरांना महागड्या दराने वीज पुरवठा करते. लॉकडाऊनच्या काळात कामगारांच्या हाताला काम नाही, अशा या परिस्थितीमध्ये महावितरणने मोठ्या प्रमाणावर वीज बिलाची आकारणी केली आहे. हे अन्यायकारक आहे. त्यामुळे संपूर्ण विज बिल माफी करावी, अशी मागणी यावेळी महिला कामगारांनी केली.