सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांचे ट्टीट…म्हणाले ‘सत्यमेव जयते’!
पुणे । प्रतिनिधी
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयनं सीबीआयकडे सोपवली आहे. तसंच मुंबई पोलिसांना सर्व दस्तावेज सीबीआयला देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.
पार्थ पवार यांनी मात्र यानंतर सत्यमेव जयते असं ट्वीट केलं आहे. त्यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यावर शरद पवारांनी त्यांना फटकारलं होतं.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहे. तसंच पाटणा पोलिसांकडे तक्रार दाखल करणंही योग्यच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
या प्रकरणाचा मुंबई पोलीस तपास करत होते. मात्र, सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर बिहार पोलिसांनी केंद्र सरकारकडे विनंती करत सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली. याचा विरोध करणारी याचिका रिया चक्रवर्तीने दाखल केली होती.
11 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवत या प्रकरणातल्या सर्व पक्षकारांना सबमिशन्स सादर करण्यात सांगितलं होतं.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी 2 महिने FIR का दाखल केला नाही याचं उत्तर मुंबई पोलीस आयुक्तांनी द्यावं. तसंच महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणी आता राजिनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
रियाची मागणी फेटाळली
पाटण्यात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीचा तपास मुंबई पोलिसांकडे देण्याबाबत रियाने याचिका दाखल केली होती. पण सुप्रीम कोर्टानं आता संपूर्ण केस सीबीआयकडे दिली आहे.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सुरुवातीपासून मुंबई पोलीस करत असून माझा जबाब मी त्यांच्याकडे नोंदवला आहे, असं रियानं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं होतं.
आपण सुशांतची गर्लफ्रेंड असल्याचं रियाने सांगितलं आहे. पण सुशांतच्या वडिलांनी आपल्या मुलाचा मृत्यू रियामुळे झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी 25 जुलैला पाटण्यातील राजीव नगर पोलीस स्टेशनमध्ये रिया विरोधात गुन्हा नोंदवला होता.